लोणी पाटी :बारामती-जेजुरी रस्त्यावर मराठा समाजाने आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार विलास कऱ्हे यांनी निवेदन स्वीकारले.
काऱ्हाटी/मोरगाव – शाहु महाराजांनी ज्या पद्धतीने मराठ्यांसाठी पहिले आरक्षण दिले आहे. तर बाबासाहेब आंबेडकरानी संविधान लिहीले आहे. समाजासाठी या दोघांचे कार्यही अनमोल आहे. यामुळे इतिहासाच्या पानावर यांची नावे आजही कोरली आहेत. इतिहास हा एकदाच घडत असतो आणि मराठ्यांना आरक्षण देऊन इतिहास घडवण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार करू शकतात, असे प्रतिपादन योगेश केदार यांनी केले
लोणी भापकर पाटी (ता. बारामती) येथे मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले. यासाठी लोणी भापकर, तरडोली, मोरगाव, जोगवडी, बाबुर्डी, काऱ्हाटी, माळवाडी, मुर्टी, जळगाव कडेपठार, सुपा यांसह बारामती तालुक्यातील हजारो मराठा बांधव व मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी सकल मराठा समाज संघटक योगेश केदार व सुभेदार तानाजी मालुसरे वंशातील कुणाल मालुसरे यांनी उपस्थित समुदायास संबोधित केले. दरम्यान, नायब तहसीलदार विलास कऱ्हे यांना उपस्थित महिलांनी निवेदन दिल्यानंतर लक्षवेधी रास्ता रोको आंदोलन संपुष्टात आले.
एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, 50 टक्क्यांतून आरक्षण मिळालेच पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.