“कविता सखये’ या कवितासंग्रहानंतर चार वर्षांनी प्रकाशित होत असलेला “मल्हारधून’ हा माधुरी विधाटे यांचा दुसरा कवितासंग्रह. उपदेश, भक्ती हा या कवितेचा आत्मा. “शहाणे करून सोडावे सकळ जन ‘ ही या कवितेची भावना. नौका बुडत असताना नावाड्याला हातातील वल्हे टाकून चालत नाही. वल्हे मारत राहणे हीच किनारा गाठण्याची शक्यता असते.
कविता वाचून जग सुधारेल अशी कवींची धारणा असते. माधुरी विधाटे यांची कविताही त्याच भावनेतून उमटलेली दिसते. मलपृष्ठावरील पाठराखणीच्या माध्यमातून विधाटे यांच्या कवितेच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील म्हणतात, “कविता कवीमनाचा अंतर्नाद असते. ती जीवनाला कवटाळते म्हणूनच ती फुलते आणि पुनःप्रत्ययाचा आनंद देते.’
प्रा. तुकाराम पाटील यांचे विधान योग्यच आहे; परंतु माधुरी विधाटे यांची कविता घडीव वाटते. रचित वाटते. असे असले तरी या कवितेत जीवनमूल्ये ठासून भरली आहेत. त्यामुळेच ही कविता महत्त्वपूर्ण ठरते. सुरक्षा अभियानमध्ये त्या हेल्मटच्या गरजेविषयी भाष्य करतात. सेल्फीमध्ये जीवघेण्या ठिकाणी सेल्फी घेणाऱ्या तरुणाईला उपदेश देतात. सुरक्षा अभियान, सेल्फी याप्रमाणेच पुरुषशक्ती, सारे पेटून उठू या यासारख्या अनेक कवितांकडे घडीव कविता म्हणून लक्ष वेधता येईल.
यातील बहुतेक कविता अभंगरचना, यमक या काव्यगुणांचा आधार घेत अवतरतात. कुठल्याही वृत्तात ही कविता अडकत नाही. ही कविता यमकाचा आधार घेत आकारात जाते. कागदावर उतरते. अंगभूत गेयता हा या कवितेचा आणखी एक गुण. त्यातही डोहाळगीत, गणेशाच्या जन्माचे पाळणागीत, लोकगीताच्या अंगाने जाणारं “सोनं’, लावणीचा बाज असणारी “पैठणी’, “राष्ट्रपिता’ हा पोवाडा अशा अनेक रचनांमध्ये एक अंतर्गत नाद आहे.
नव्याने लिहिणाऱ्या कवीची कविता अडखळते, ठेचाळते. कधीकधी नावीन्य झुगारून आत्मविश्वासाने आकार घेते. परिपक्वतेची ग्वाही देणाऱ्या अनेक कविता या कवितासंग्रहात सापडतात. कृष्णनाद ही त्यापैकीच एक. त्यातल्या या ओळी-
अजून घुमतो पावा मंजुळ,
नदी किनारी कदंब व्याकुळ
दह्या दुधाचे घट भरलेले,
तरी अंतरी झुरते गोकुळ
ही कविता जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. उत्तम निर्मिती मूल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे यांनी पुस्तकाची निर्मिती कशी असावी हे दाखवून दिले आहे. संतोष धोंगडे यांचं समर्पक मुखपृष्ठ हे या कवितासंग्रहाच्या देखणेपणात अधिकच भर घालतं.