“बॉयकॉट बॉलीवूड’ ट्रेंडमुळे चित्रपटांची साडेसाती सुरू आहे. ती दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्यासाठी मदत करावी, असे साकडे योगींना घातले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गेल्या आठवड्यात मुंबईत होते. त्यांनी काही उद्योजकांशी महाराष्ट्राच्या राजधानीत चर्चा केली. उत्तर प्रदेशात गुंतवणूक करावी असा त्यांचा आग्रह होता. योगींच्या दौऱ्यात महाराष्ट्रात कोणते राजकीय फटाके फुटले नाहीत. लोकांच्या अर्थात माध्यमांतील लोकांचे कान उभे राहावेत अशा नेत्रदीपक राजकीय भेटीही यावेळी झाल्या नाहीत. तथापि, चित्रपटसृष्टीतील ज्याला बॉलीवूड म्हटले जाते, काही लोकांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि त्याला चांगली हवाही मिळाली.
काय होता भेटीचा उद्देश?
भारतीय चित्रपटसृष्टीचे मुंबई हे माहेरघर समजले जाते. त्याचे कारण प्रादेशिक भाषांमध्ये अनेक दिग्गज जन्माला आले अन् त्यांनी आपापली भाषिक चित्रपटसृष्टी जरी समृद्ध केली तरी कलाकारांना खरी ओळख मिळते ती मुंबई या मायानगरीतून. त्यामुळे भारतीय चित्रपट आणि मुंबई हे नाते घट्ट आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या अगोदरपासून चित्रपटसृष्टी आपल्या राज्यात आणण्याबाबत योगींची चाचपणी सुरू आहे. नोएडा येथे चित्रपटसृष्टी स्थलांतरित करण्याचा त्यांचा मानस असावा. किमान तेथे फिल्म सिटीत शूटींग सुरू करण्याबाबत आणि गुंतवणुकीबाबत त्यांनी चाचपणी केली. ज्यांचा हिंदी चित्रपटांच्या अर्थकारणाशी थेट संबंध येतो अशा काही जणांनी त्यांची भेट घेतली. मात्र, या भेटीचा सगळा प्रकाशझोत पडला तो अभिनेता सुनील शेट्टी यांनी योगी यांना केलेल्या आवाहनाकडे. “बॉयकॉट बॉलीवूड’ हा जो ट्रेंड सध्या सुरू आहे आणि चित्रपटसृष्टीला जे लांच्छन लावले गेले आहे ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्यासाठी मदत करावी, असे साकडे योगींना त्यांनी घातले आहे.
हिंदी चित्रपटांची सध्या साडेसाती सुरू आहे. अनेक मोठे चित्रपट आणि मोठ्या कलाकारांचे चित्रपट डब्यात गेले आहेत. कोणत्याही कलाकाराला आणि निर्मात्याला तोंड वर काढायला जागा मिळू दिलेली नाही. चालू म्हणजे 2023 या वर्षात तब्बल अडीच हजार कोटी रुपये बड्या चित्रपटांत गुंतवण्यात आले आहेत. “बॉयकॉट बॉलीवूड’ नावाचा ट्रेंड साडेसातीला कारणीभूत आहे. तो असाच कायम राहिला तर अनेक निर्माते आणि दिग्दर्शक रस्त्यावर येणार आहेत. हिंदी चित्रपटांना लक्ष्य करण्याचा ट्रेंड नक्की केव्हा सुरू झाला ते ठोस सांगता येणार नाही. मात्र, सुशांतसिंह राजपूत या गुणी अभिनेत्याच्या कथित आत्महत्येनंतर हा प्रकार पेटल्याचे म्हटले तर ते चुकीचे म्हणता येणार नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर व साधारण त्याच सुमारास समोर आलेल्या “मी टू’ अभियानामुळे या चमकत्या जगामागचा अंधार लख्खपणे समोर आला.
इंडस्ट्रीतील वशिलेबाजी, नायक अथवा नायिका होण्याचे स्वप्न पाहून मुंबईत आलेल्या महिलांचे आणि पुरुषांचेही शोषण, काही विशिष्ट घराण्यांची मक्तेदारी, गुणवत्तेला डावलून आपल्या कम्पूतील लोकांनाच संधी देण्याची वृत्ती, त्याकरता प्रसंगी परदेशातून अगदी पाकिस्तानातून आलेल्या कलाकारांनाही दिले जाणारे प्राधान्य, एखाद्या कथित स्टारची भाईगिरी, धर्माचा कथितपणे केला जात असलेला अवमान, आपल्या मर्जीत नसलेल्या कलाकारांची कारकीर्दच संपवण्याची मुजोरी अशा अनेक घटना सातत्याने समोर आल्या आहेत किंवा सुशांत प्रकरणानंतर त्या समोर येऊ लागल्या आहेत. यातील एकही आरोप खोटा नाही. सुनील शेट्टी यांचे म्हणणे आहे की, आमच्या क्षेत्रातील 99 टक्के लोक चांगले आहेत. आम्ही अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. “बॉर्डर’सारख्या चित्रपटात आम्ही काम केले. लोकांनी आम्हाला प्रेम दिले आणि त्यामुळेच आम्ही यशस्वी झालो. मात्र, आता चित्रपटसृष्टीला एक ग्रहण लागले आहे. मात्र, हे सगळे आताच होते आहे असे नाही, तर ते पूर्वीपासून होते आहे. कोणाचा मुलगा अथवा मुलगी म्हणून संधी दिलीच जाते. ते नाकारता येणार नाही. एकप्रकारे त्याला किंवा तिला लादलेच जाते. अर्थात, त्यात जमेची बाजू म्हणजे असे लादलेले कलाकार नंतर स्वत:च्या पायावर चार पावलेच जेमतेम चालतात आणि नंतर घरी बसतात. अशी असंख्य उदाहरणे आहेत. पण कोणाला लादण्यासाठी कोणालातरी संपवले जाते. ती संपवण्याची प्रक्रिया जाहीरपणे नाही, तर पडद्यामागे होत असते. त्यातून सुशांतसारखा एखादा त्याचा बळी ठरतो. केवळ पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांबाबतच हे नाही, तर पडद्यामागे जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रत्येक विभागातही तेच घडते.
अगदी पुरस्कार सोहळ्यांतही टुकार चित्रपटांना, गाण्यांना आणि सुमार कलाकारांना दिले जाणारे पुरस्कार तेच ओरडून सांगतात. पुरस्कार देणारे, ते घेणारे आणि हे सगळे भव्यतेने सादर करणारे यांची एक अभद्र युती झाली आहे. काही प्रस्थापितांच्या डोक्यात गेलेली हवा, त्यांचा उद्दामपणा आणि टोकाची गुन्हेगारी मानसिकता या सगळ्याचा परिपाक म्हणून अनेक गुणी कलावंत देशोधडीला लागले आहेत, हे वास्तव आहे. सगळेच कलाकार कुबेरपुत्र नाहीत. काही सर्वसामान्य पार्श्वभूमीतूनही प्रचंड कष्टाने पुढे आले आणि आपले स्थान निर्माण करण्यात त्यांना यश आले. मात्र, त्यांच्या या संघर्षाच्या प्रवासाची पुढे जाणीव न ठेवता तेही त्यांच्यासारखेच वागतात ज्यांच्याशी लढत ते तेथपर्यंत पोहोचलेले असतात.
पद्धतशीर कारस्थान?
बॉलीवूडबद्दल असंख्य नकारात्मक प्रसंगी घृणास्पद बाबी समोर आल्या असल्या, तरी हा प्रचंड मोठा उद्योग आहे आणि असंख्य हातांना तो काम देतो आणि काम करणाऱ्या असंख्य लोकांचे घटकाभर मनोरंजन करतो त्यामुळे ते दुर्लक्षित करण्यासारखे नाही. काही व्यक्ती अथवा प्रथांबाबत नाराजी असू शकते व ती व्यक्त केलीही पाहिजे. पण सरसकट बहिष्काराचा जो ट्रेंड चालवला जातो आहे ते एक सुनियोजित कारस्थान असल्याची शंका घेण्यासही वाव आहे. चित्रपट म्हणजे थोडे पदरचे घालून विषय खुलवला जातो. ते एक मनोरंजन म्हणून स्वीकारायचे किंवा काहीवेळा अतिरंजित म्हणून सोडून द्यायचे असते. पण चुका शोधण्यासाठी आणि बहिष्काराचे निमित्त मिळण्यासाठीच एखादी समांतर यंत्रणा प्रस्थापित झाली असेल, तर ती अत्यंत धोकादायक आणि विनाशकारी आहे. तसे गढूळ वातावरण तयार झाले आहे.
मुंबईची सूत्रे उत्तरेकडे?
गेली सात दशके बॉलीवूडचे निर्णय मुंबईतच घेतले गेले. त्या त्या वेळेच्या प्रभावशाली व्यक्तींचा त्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव राहिला. एक अदृश्य हात त्यामागे असायचाच. जगातली कोणतीही चित्रपटसृष्टी अशा बाहेरच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकलेली नाही. मात्र, आता मुंबईतील सिनेसृष्टीची गाऱ्हाणी उत्तर भारतातल्या एका नेत्याकडे मांडली जात असतील, तर महाराष्ट्रातील सूज्ञांनीही एकत्र येऊन त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण प्रत्येक बाबीचे भांडवल करून आपले महत्त्व कमी करून हाती होते ते सगळेच गमावून बसतोय का, याचा त्यांच्याकडून विचार होण्याची आवश्यकता नक्कीच आहे. योगी पंतप्रधानांना हस्तक्षेप करायला लावतील न लावतील, मुळात बॉलीवूडने आणि तेथे कार्यरत असणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले आणि चूक दुरुस्ती केली तरी पुरेसे आहे.