आंध्र प्रदेशमधील तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या पक्षाची सूत्र चिरंजीव एन लोकेश नायडू यांच्याकडे सोपवण्याचे संकेत दिले आहे. त्याबाबत…
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू हे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अधिक सक्रिय झाले आहेत. राज्यात ते ठिकठिकाणी रोड शो घेत असून, अशाच एका रोड शो दरम्यान नेल्लोर जिल्ह्यात चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये सात जण ठार झाले.2024च्या विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसमचा पराभव झाला, तर ती माझी शेवटची निवडणूक असेल, असे चंद्राबाबूंनी महिनाभरापूर्वीच जाहीर केले आहे. पक्षाची सूत्रे आपले चिरंजीव एन लोकेश नायडू यांच्याकडे सोपवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. तेलुगू देसमची स्थापना एन. टी. रामाराव यांनी केली.
लक्ष्मी पार्वती या त्यांच्या पत्नी. लक्ष्मी यांचा हा दुसरा विवाह होता. एनटीआर यांच्या निधनानंतर दोनच वर्षांनी म्हणजे 1995 साली लक्ष्मी यांनी एनटीआर तेलुगू देसम पार्टीची स्थापना केली. त्यावेळी भाजपच्या पाठिंब्याने लक्ष्मी या विधानसभेवर निवडून आल्या होत्या. 42 ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले होते. परंतु त्यांच्या शिवाय त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. लक्ष्मी या त्यानंतर कॉंग्रेसमध्ये गेल्या आणि सध्या त्या वायएसआर कॉंग्रेसमध्ये आहेत.1999 साली लक्ष्मी यांनी दोन ठिकाणाहून विधानसभा निवडणूक लढवली आणि दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. चंद्राबाबू हे एनटीआर यांचे जावई. आता लोकेशकडे पक्षाची सूत्रे दिली गेल्यानंतर घराणेशाहीची परंपरा सुरू राहील.
गेल्या बुधवारी तेलुगू देसम पक्षाने जाहीर केले की, लोकेशच्या नेतृत्वाखाली “युवा गलम’ म्हणजेच “युवकांचा आवाज’ ही पदयात्रा सुरू होईल. 27 जानेवारीपासून सुरू होणारी ही पदयात्रा चारशे दिवस चालेल आणि चार हजार किलोमीटर प्रवास करेल. ही पदयात्रा प्रभावीपणे जनतेपर्यंत आपला संदेश पोहोचवेल आणि जगन मोहन रेड्डी यांचे सरकार उलथून पडेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. लोकेश सध्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून, चंद्राबाबू यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे जाण्यास पक्षातील अन्य कोणत्याही नेत्याने हरकत घेतलेली नाही. घराणेशाहीवर आधारलेला पक्ष असाच असतो. जगन यांनीही राज्यभर पदयात्रा काढून प्रचंड लोकप्रियता संपादन केली आणि सत्ता मिळवली. असो. लोकेशने पूर्वी माहिती तंत्रज्ञान आणि पंचायत राज ही खाती मंत्री या नात्याने सांभाळली आहेत. त्यांना तरुणांच्या समस्यांची त्याचप्रमाणे तळागाळातील परिस्थितीची माहिती आहे, असे सांगितले जाते. पदयात्रेमुळे लोकेशचे रूपांतर जननायकात होईल, असाही दावा केला जात आहे.
चंद्राबाबू हे जेव्हा आंध्रचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी हैदराबादचे रूपांतर सॉफ्टवेअर नगरीत म्हणजेच “सायबराबाद’मध्ये केले. देशविदेशांतील प्रचंड गुंतवणूक आंध्रमध्ये आकर्षित करून घेतली. 2019 मध्ये मात्र वायएसआर कॉंग्रेसने आंध्रमध्ये तुफानी यश मिळवले आणि भाजपशी संबंधही चांगले ठेवले. वास्तविक भाजपला दक्षिणेत हातपाय विस्तारायचे आहेत. परंतु आंध्रमध्ये त्यांनी फारसे लक्ष घालू नये, या दृष्टीने जगनने खेळलेली ही चाल होती. परंतु मुख्यमंत्री जगन यांनी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन पाळले नाही. याउलट 2014 ते 19 या काळात तेलुगू देसमने मोठ्या प्रमाणात रोजगार दिला होता, असा युक्तिवाद केला जातो. लोकेशने गेल्या वर्षीपासून जगन सरकारविरुद्ध ठिकठिकाणी आंदोलने केली.
एका ठिकाणी त्यांच्यावर दगडफेक झाली, तेव्हा लोकेशने फेकलेला दगड हातात पकडला आणि आम्ही असल्या हल्ल्यांमुळे घाबरणार नाही, अशी गर्जना केली. गुंतुर जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार होऊन तिचा खून करण्यात आला होता, तेव्हा तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी लोकेश गेले होते. त्यावेळीदेखील दगडफेकीची घटना घडली. लोकेश विरुद्ध जगन सरकारने अकरा गुन्हे दाखल केले आहेत. ते सर्व आंदोलनाशी संबंधित आहेत. बनावट दारू, जुगारी अड्डे यांच्या विरोधात त्याने आंदोलने केली. जगन यांच्या एका मंत्राच्या मालकीच्या इमारतीतच जुगारी अड्डा झाल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा लागला. लोकेश यांनी काही प्रमाणात आपल्या कामातून ठसा उमटवला आहे.
ते स्वतः स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीए झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी नायडू कुटुंबाची हेरिटेज फूड्स लिमिटेड ही कंपनी चालवली. ऑक्टोबर 2012 ते मे 2013 या काळात चंद्राबाबू यांनी 2800 किलोमीटर अंतराची पदयात्रा केली. ही यात्रा यशस्वी करण्यामध्ये लोकेशनी महत्त्वाची कामगिरी निभावली. ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकांत तेलुगू देसम सत्तेवर आली. त्याचवेळी चंद्राबाबू यांनी लोकेशवर पक्षाचे सरचिटणीसपद सोपवले. त्यानंतर दोन वर्षातच त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले आणि मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
सामान्य घरातील व्यक्ती असती तर हे घडले नसते. मे 2019 मध्ये लोकेशने मंगलागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु वायएसआर कॉंग्रेसच्या रामकृष्ण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. अर्थात त्यावेळी जगन मोहन रेड्डी यांची लाटच होती. परंतु राजकारणात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला येत नसते. त्यामुळे लोकेश यांनी पदयात्रा यशस्वी केली, तर उद्या आंध्रमध्ये सत्तापालट होणारच नाही, असे नाही.
हेमंत देसाई