सोमवारी रात्री आलेल्या पावसाने पुण्याची दाणादाण उडवली. शहराचा सारा मध्यवर्ती भाग पाण्याखाली गेला. अन्यत्र उपनगरामध्ये अशीच स्थिती होती. यंदाच्या पावसाळ्यात पुणेकरांचे एकूणच फार हाल झाले. दरवेळी पावसाळा आला की तुंबलेल्या मुंबईच्या बातम्या सर्वत्र दिसतात.
यंदा मुंबई फारशी तुंबली नाही. तिथे पाण्याचा निचरा करण्यासाठी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक झाले. पण फारसे कधी न तुंबणारे पुणे मात्र यंदा पार पाण्यात गेले. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच रस्त्यांवरील खड्ड्यांनी पुणेकर हैराण झाले होते. त्यावर तात्पुरती डागडुजी केली गेली, पण तीही या पावसाळ्यात वाहून गेली आणि पुणेकरांच्या हलाकीत भरच पडली. डेक्कनचा परिसर, दगडूशेठ हलवाई गणपती समोरील रस्ता, स्वारगेट, हडपसर, नवी पेठ विठ्ठल मंदिर परिसर, नारायणपेठ, नगररोड, औंधचा बराच भाग, भवानीपेठेतील आशापुरा सोसायटीचा परिसर, पद्मावती परिसर अशा साऱ्या ठिकाणी पाणी तुंबून त्या त्या भागाला नद्यांचे स्वरूप आले. नागरिकांनी सोशल मीडियावर त्याचे भरभरून व्हिडिओ टाकले. प्रत्येक व्हिडिओ थक्क करणारा होता. काल एकाच दिवशी 80 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने ही स्थिती उद्भवणे साहजिक आहे, असे जरी गृहीत धरले तरी पाण्याचा निचरा ज्या वेगाने व्हायला हवा तो झाला नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पावसाळ्याच्या आधी उपाययोजनांच्या संबंधात बैठकांचे सत्र पार पडते.
पावसाळी कामे तातडीने हाती घेतली जातात, मग एखाद्या जोराच्या पावसाने हा सारा देखावा उघडा पडतो. पुणे आता राहण्याच्या लायकीचे शहर राहिलेले नाही वगैरे टोकाच्या प्रतिक्रिया ऐकू येऊ लागतात. आताही पुण्याच्या पावसाळी नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्यानंतर पुन्हा काही तोंड देखल्या बैठका होतील. नवनवी आश्वासने पुणेकरांच्या तोंडावर फेकली जातील आणि तोपर्यंत पावसाची पूर्ण माघार झालेली असेल. मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती निर्माण होईल. पाण्यात गेलेल्या पुण्याच्या यंदाच्या स्थितीची सांगली, कोल्हापूरच्या मंडळींनीही आता थट्टा सुरू केली आहे. स्मार्ट पुण्याच्या वल्गना आपण गेले बरेच दिवस ऐकत आहोत. आपले पुणे आता स्मार्ट शहर होणार आहे, या स्वप्नात पुणेकरांचे काही दिवस बरे गेले, पण यातील थोतांडही लगेच उघडे पडले आहे. सगळे पुणे स्मार्ट होणारच नव्हते, केवळ औंध, बाणेरचा काही भागच स्मार्ट शहर म्हणून विकसित होणार होता ही बाब नंतर अनेकांच्या लक्षात आली. आता तर तेथील कामेही रेंगाळली असून काही जणांच्या मते मोदी सरकारने हा स्मार्ट सिटी प्रकल्पच गुंडाळला आहे. नाही म्हणायला मेट्रोची कामे मात्र सध्या जोरात आहेत. पण पुण्यात काल जी पूर परिस्थिती निर्माण झाली, त्याला मेट्रोची कामेच कारणीभूत ठरली असल्याची तक्रार ऐकू येऊ लागली आहे.
अनेक ठिकाणच्या पावसाळी चेंबरमध्येच म्हणे महामेट्रोने खांब उभारले आहेत, त्यामुळे तेथील पाणी वाहून जाण्यास अटकाव झाला. काल सारे डेक्कन याच कारणाने पाण्याखाली गेले. डेक्कन परिसरातील पाणी वाहून जाण्यासाठी तेथे दगडी बॉक्स कल्व्हर्ट बांधण्यात आली होती. मात्र, मेट्रोने त्या कल्व्हर्टमध्येच म्हणे खांब उभारले आहेत. पावसाळी चेंबरमध्ये खांबांची उभारणी झाली तर त्यातून पाण्याच्या निचऱ्याला अडथळे येऊ शकतात याची कल्पना तेथील अभियंत्यांना किंवा एकूण महापालिका यंत्रणेला का आली नाही, हा प्रश्न अनाठायी आहे काय. पण जबाबदारीने कोणीच कोठे लक्ष देताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महापालिका आयुक्तांची प्रशासकीय राजवट आहे. महापालिकेच्या सध्याच्या विद्यमान आयुक्तांचा कारभार फार लौकिकाचा आहे, असे नव्हे. पण महापालिकेतील नगरसेवकांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर शहराच्या नियोजनाची सारी सूत्रे एकतर्फीपणे आयुक्त्यांच्या हातात आली असताना त्यांनी अपेक्षित हालचाली केलेल्या दिसल्या नाहीत. उलटपक्षी ज्या कामांना नगरसेवकांकडून विरोध होत होता ती कामेही त्यांना हातात घेऊन सहज पूर्ण करता आली असती. पण विद्यमान आयुक्तांच्या लहरीपणामुळे पुण्याचे फार काही भले होऊ शकलेले नाही. पुण्यातून वाहणाऱ्या अंबिल ओढ्याच्या पुराने तीन वर्षांपूर्वी पानशेतच्या पुराची आठवण यावी तशी स्थिती उद्भवली होती. पण अजून या ओढ्याला संरक्षक भिंत बांधण्याचे काम महापालिकेकडून पूर्ण होऊ शकलेले नाही. काही ठिकाणचे भिंतीचे काम हे सोसायट्यांच्या खासगी जागेत असल्याचे कारण देऊन तेथील पडलेली भिंत तशीच ठेवली गेली आहे.
पद्मावतीची गुरूराज सोसायटी हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे. नगर नियोजनातील असे अनेक कच्चे दुवे कालच्या पावसाने उघडे पाडले आहेत. शहरातील बिघडलेल्या स्थितीविषयी जागरूक पुणेकर तत्परतेने आवाज उठवत असतात. शहरातील प्रसारमाध्यमांचेही पुण्यातील अनागोंदीवर जागरूकतेने लक्ष असते. त्यामुळे साहजिकच कालच्या दैन्याअवस्थेबरोबरच पुण्यात सतत होणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्ड्यांविषयी चारही बाजूने ओरड सुरू झाल्यानंतर आपल्या पालकमंत्र्यांनी आता त्यात लक्ष घालायचे ठरवले आहे. कालच त्यांनी एक बैठक घेऊन शहरातील सुमारे चारशे किमी रस्त्यांची नव्याने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. चालू पावसाळा संपल्यानंतर 10 नोव्हेंबरपासून ही दुरुस्ती सुरू केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीही एक आराखडा तयार केला गेला आहे आणि आवश्यक त्या ठिकाणी भुयारीमार्ग आणि उड्डाणपूल उभारणी केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणा त्वरित अंमलात येणे महत्त्वाचे आहे. अन्यथा स्मार्ट सिटीसारखी या घोषणांची स्थिती होऊ नये म्हणजे मिळवली. शहराच्या नदी सुधारणा योजनेचे भिजत घोंगडे अनेक वर्षे तसे पडून आहे. त्याकडेही आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पुण्याकडे केले जाणारे दुर्लक्ष सत्ताधाऱ्यांना महागात पडते याचा अनुभव मागच्या सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी यात काळजीपूर्वक लक्ष घालणे आवश्यक आहे. नुसत्या विकासाच्या वल्गनांनी पुणेकर भारावून जात नाहीत. त्यांना प्रत्यक्षातले काम हवे असते. पुणे असे वारंवार पाण्यात जाणार असेल तर नागरिकांनी तरी ते का सहन करावे, हा प्रश्न रास्त आहे.