मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन बंड पुकारला आहे. या बंडात अनेक मंत्रीही सहभागी आहेत. त्यामुळे सरकार कधीही कोसळणार अशी शक्यता व्यक्त होतेय. त्यातच बंडखोर गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वारंवार आव्हान देण्यात येत आहे.
बंडखोर गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून थेट फ्लोर टेस्ट घेण्याची मागणी केली आहे. केसरकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहे. आम्ही एकटे पडलो असताना फडणवीसांनीच आम्हाला संरक्षण दिलं आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी फ्लोर टेस्ट घ्या, आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असंही केसरकर यांनी म्हटलं. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.
केसरकर पुढं म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरू आहे. फडणवीस आणि आपले चांगले संबंध आहे. रात्री १२ वाजता फोन केला तरी ते उचलतात. आम्ही त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यात काय बिघडलं. ते आमच्या पाठिशी असून त्यांच्यामुळे आम्हाला भाजप शासित राज्यात सरंक्षण मिळाल्याचं केसरकरांनी नमूद केलं.