पुणे – “पुण्याचे नवीन महापौर 15 मार्चपर्यंत येणे अपेक्षित असताना केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षामुळे पुणे महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती गेला आहे. सर्वसामान्यांची कामे खोळंबली असून, नागरिकांना वेठीस धरले जात आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या महापालिकेची ही अवस्था दुर्दैवी आहे,’ असा सूर शहरातील राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी काढला.
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आणि वक्तृत्वोत्तेजक सभेच्या सहकार्याने आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या समारोपानिमित्त “मनपा निवडणूक आणि गोंधळाची परिस्थिती’ या विषयावर पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत आणि महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक सहभागी झाले होते. मंदिरचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, कार्याध्यक्ष भाई कात्रे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश पायगुडे यांनी केले.
महापालिकेच्या आगामी निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकट्याच्या बळावर लढण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे आमचे वरिष्ठ नेते घेतील.
– प्रशांत जगताप,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
आमची सध्याची स्थिती अभिमन्यूसारखी झाली आहे, तरी लढा देण्याला सक्षम आहोत. आमच्यापेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसची निवडणुकीची तयारी जोरात आहे. परंतु आजही आम्ही स्वतःच्या बळावर निवडणूक लढवू आणि जिंकून महापालिकेत सत्तेत येऊ शकतो.
– रमेश बागवे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस
आम आदमी पक्षाकडे कार्यकर्त्यांची फळी नाही किंवा ताकद नाही, असा आरोप केला जातो. सर्वसामान्यांना आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाचा आधार वाटतो आणि आपल्या प्रश्नांची सोडवणूक हेच करू शकतात, असा विश्वास आम्ही कमावला आहे. पुण्यात आमची पाटी सध्या कोरी असली, तरी सर्वसामान्यांच्या मनात आम्ही जागा निर्माण करत आहोत.
– मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष, आप
आम्ही भाजपबरोबर असलो, तरी आमची रिपाइंची वेगळी विचारधारा आहे. त्या विचारधारेला मानणारा वर्ग समाजात मोठ्या प्रमाणावर असून, रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकीत आम्ही नक्की चमत्कार घडवू. आमची सध्या संख्यात्मक ताकद नसली, तरी आम्ही आमच्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची ताकद आहे.
– शैलेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष, रिपाइं