मंचर – राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत लांडेवाडी येथे सुरू होण्याचा मान आढळराव पाटील यांना आणि लांडेवाडी ग्रामस्थांना मिळू नये, यासाठी बैलगाडा शर्यतींवर निर्बंध आणल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शितलादेवी यात्रा उत्सवानिमित्त आठवड्यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी नियमांचे पालन करून यात्रा भरविण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार यात्रेची जय्यत तयारी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केली. शनिवारी (दि. 1) बैलगाडा शर्यत होणार होती;
परंतु शुक्रवारी (दि. 31) रात्री साडेनऊ वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचे आदेश जारी केले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील आणि
बैलगाडा मालकांनी शनिवारी सकाळी बैलगाडा घाटात जाऊन जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, बैलगाडा शर्यत होणार नाही, हे दुर्दैव आहे. जिल्ह्याचे राजकारण, राज्याचे राजकारण आणि ग्रामीण भागातील राजकारण वेगवेगळे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी यात पडू नये. जवळपास दोनशे टपरीवाले, छोटे व्यावसायिक, हॉटेलवाले या ठिकाणी रात्रीपासून थंडीमध्ये कुडकुडत आपला व्यवसाय करण्यासाठी आले. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. त्यांनी तयार केलेला माल आता वाया जाणार याला जबाबदार कोण, असा प्रश्न करून ते म्हणाले, आम्ही सरकारच्या नियमांच्या विरुद्ध नाही.
आम्ही सरकारबरोबर आहोत; परंतु असे करीत असताना प्रशासनाचे कामकाज बेजबाबदारपणाचे आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या गोष्टीचा निषेध करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे व राज्य सरकारचे नियम पाळून सात वर्षे राज्यातील शेतकऱ्यांनी बैलगाडे पळवले नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाली. लांडेवाडी येथे राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते.