नवी दिल्ली – सध्या देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती आहे, अशी घणाघाती टीका करतानाच सर्व विरोधक एकत्रित आल्यास सहा महिन्यातच चांगले परिणाम दिसतील, असं तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
पेगॅसस प्रकरणात सध्या विरोधक एकवटत आहेत. भविष्यात या विरोधकांची आघाडी झाली तर त्याचे नेतृत्व कोण करणार का, असा प्रश्न आज दिल्लीत ममता यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की उद्या काय होईल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, पण कोणीही नेतृत्व केले तरी मला काही अडचण नाही.
पेगॅसस प्रकरणात विरोधी पक्षांच्या एकत्रित बैठकीला ममता बॅनर्जी दिल्लीत असूनही उपस्थित नव्हत्या, त्या विषयी विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, मी या लढाईत सर्वांच्या पुढे आहे आणि आम्ही एकत्रितपणेच ही लढाई लढणार आहोत.
तुम्ही विरोधकांचे नेतृत्व करणार काय असे विचारता त्या म्हणाल्या की, मी साधी कार्यकर्ती आहे आणि कार्यकर्तीच राहणार आहे. लोकसभेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी दीर्घकालीन चर्चा करावी लागणार आहे. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर ही चर्चा सुरू होईल. सर्वच विरोधकांनी एकत्र येऊन भक्कम आघाडी उघडली पाहिजे, या विचारावर आम्ही सहमत आहोत.
आम्हाला आता एका समान व्यासपीठावर एकत्र यावे लागेल असेही त्या म्हणाल्या. विरोधी पक्षांचे फोन टॅप आहेत त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की माझाही फोन टॅप होत आहे, त्यामुळे मला फोनवर कोणाशीच बोलता येत नाही. पेगॅसस मुळेच प्रत्येक जण धोक्यात आला आहे.