मुंबई : यूपीए आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि त्यातील प्रमुख पक्ष काँग्रेस आहे. कोणी यूपीए मध्ये येऊ इच्छित असेल तर त्यांचे स्वागतच आहे. पण कोणी तिसरी आघाडी काढायला निघाले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला देश वाचवायचा आहे आणि देश वाचवायला काँग्रेस सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिलेली आहे.
यूपीए चे दार खुले आहे. जे येतील त्याचं स्वागत केलं जाईल. मी संजय राऊत यांना धन्यवाद देतो, त्यांना ही जाणीव झाली की काँग्रेसच यूपीए चा आत्मा आहे. कारण लोकांच्या जिविताचे रक्षण करणे ही काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे आणि भविष्यातही राहणार आहे, असं देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘महाविकास आघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी आहे. राष्ट्रीय स्तरावरही अशा आघाडीची गरज आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारली. भविष्यात त्यांनी या देशात विरोधीपक्षाची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान उभं करावं, अशी सगळ्यांची इच्छा आहे.
या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही.’ असे वक्तव्य काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. आणि याच पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.