सातारा (प्रशांत जाधव) – गुटख्याची अवैध विक्री केल्याप्रकरणी कोरेगाव तालुक्यातील एका गावातील तरुणावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. असे असताना त्या गुन्ह्यात वीस हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक फौजदार प्रल्हाद पाटोळे यांना अटक झाली आहे.
त्यामुळे या प्रकरणात नेमकी “खुट्टी’ कोणी मारली, याची चर्चा पोलीस दलात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाच्या तळाशी जाऊन तपास करावा. पाटोळे यांचा बोलावता धनी शोधण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची अवैध विक्री केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित होईल, या अपेक्षेने पोलीस उपअधीक्षक डॉ. गणेश किंद्रे यांनी त्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे सोपवला; परंतु या गुन्ह्याचा तपास काय झाला, हे कळण्याआधीच गुटखा विक्रीचे रॅकेट उघड होईल, या आशेवर बसलेल्या किंद्रे यांचा फोन 6 मार्च रोजी वाजला आणि गुटखा विक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताला जामिनामध्ये मदत करण्यासाठी 20 हजाराची लाच घेताना एएसआय पाटोळे सापडल्याचे त्यांना समजले.
या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस निरीक्षक मोरे यांच्याकडे गुन्ह्याचा तपास असताना, त्यामध्ये पाटोळेंनी वरिष्ठांना अंधारात ठेवून पैसे घेतले का? वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तपास असलेल्या गुन्ह्यात कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी लाच स्वीकारण्याचे धाडस करू शकतो का? यात कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे का? या प्रश्नांची उत्तरे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना शोधावी लागतील.
कारण एका बाजूला पोलीस अपहरण झालेल्या लोकांना सोडवून आणत आहेत. गजा मारणेसारख्या गुंडाला बेड्या ठोकत आहेत. पंजाबमध्ये लपून बसलेल्या संशयितांच्या मुसक्या आवळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला कोरेगावच्या घटनेने पोलीस दलाला शरमेने मान खाली घालायला लावली आहे.
कोरेगावच्या प्रकरणात फांद्या छाटण्यापेक्षा खोडच तासणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर चांगले काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल खचेल आणि खाबूगिरी करणारे “मोर’ पिसारा फुलवून नाचत राहतील.
प्रकरणाच्या तळाशी ‘एसीबी’ कधी जाणार?
कर्मचारी एकसंध असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सातारा कार्यालय सध्या चांगली कामगिरी करत आहे; परंतु कोरेगावसारख्या प्रकरणांमध्ये कागद रंगवण्यापेक्षा बडे मासे पकडण्यासाठी हा विभाग प्रकरणाच्या तळाशी का जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.