107194 लाख क्विंटल साखर उत्पादित : ग्राहकांना मिळणार दिलासा
पुणे – उस गाळप हंगामात यंदा राज्यात एकूण 951.79 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. त्यातून 107194 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. गतवर्षी 950.69 लाख मेट्रिक टन गाळप आणि 106781 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली होती. त्या तुलनेत यंदा 4 लाख क्विंटल साखरेचे जास्त उत्पादन झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात भाव नियंत्रित राहून लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
सततच्या दुष्काळामुळे 2015 मध्ये ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट झाली होती. संपूर्ण हंगामांवर विपरित परिणाम झाला. औरंगाबाद प्रादेशिक विभागात केवळ 19 लाख 61 हजार 200 क्विंटल सर्वात कमी साखर उत्पादित झाली आहे. त्याचे परिणाम बाजारात दिसून आले. अशीच स्थिती राज्यभर होती. बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होऊन साखरेचे दर प्रथमच 42 रुपये किलोवर जाऊन पोहोचले होते.
2016 मध्ये सरासरी एवढा पाऊस पडला होता. परतीचा मान्सूनने मेहरबानी केली होती. 2017-18 मधील मान्सून सरासरीपेक्षा कमी पडला. परतीचा पावसाने दिलासा दिला होता. त्यामुळे तीन हंगामात ऊस लागवड दोन्ही वर्षे बऱ्यापैकी झाली होती. 2018 मधील मान्सून सरासरीपेक्षा 30 ते 35 टक्के कमी पडला. मात्र, ऊस उत्पादकांनी पाण्याची बचत व गरजेनुसार वापर या तंत्राचा अवलंब केल्याने उसाचे उत्पादन चांगले हाती आले. 2017-18 च्या हंगामात 1067.71 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली होती. दर 7 ते 8 रुपयांनी घसरून 34 रुपये किलोवर खाली आले होते. यंदा 2018.19 चालू हंगामात गतवर्षीच्या तुलनेत 4 लाख क्विंटलने वाढ होऊन 1071. 94 लाख क्विंटल साखर उत्पादित झाल्याची नोंद साखर आयुक्तालय पुणे यांनी घेतली आहे.
कोल्हापुरातून सर्वाधिक उत्पादन
औरंगाबाद प्रादेशिक विभागातील साखर कारखान्यातून 93 लाख क्विंटल, नांदेड कारखान्यातून 88.27 लाख, कोल्हापूर कारखान्यातून सर्वात जास्त 267.43 . लाख क्वि., पुणे240.66 लाख क्विं., सोलापूर 208.36 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विदर्भ पाण्याच्या अभावामुळे ऊस उत्पादन, साखर कारखाने, साखर उत्पादनात खूपच मागे आहे.