ज्ञानेश्वर फड/ प्रीतम पुरोहित
तरडगाव –
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे।।
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म।
उदरभरण नोहे जाणिजें यज्ञकर्म।।
हा श्लोक म्हणत लाखो वारकरी बांधव अन्नाचा घास घेतात. वारी काळात वारकऱ्यांसाठी अनेक ठिकाणी अन्नदान केले जाते. असेच एक कुटुंब तरडगाव, जि. सातारा येथे आहे. तीन दशकांपासून अखंड सुरू असलेल्या त्यांच्या या सेवाकार्याची माहिती “प्रभात’च्या वाचकांसाठी…
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा नवव्या दिवशीचा मुक्काम तरडगाव येथे होता. या दिंडीतील वारकऱ्यांची भोजन आणि निवासाची व्यवस्था हे मोठे आव्हान असते. अशावेळी सोहळा जेथे मुक्कामी आहे, तेथील ग्रामस्थ वारकऱ्यांना घर-अंगणात राहण्यासाठी जागा देत असतात. काहीजण भोजन देतात. तरडगाव येथील नारायण राऊत आणि कुटुंबीयांनी 30 वर्षांपूर्वी वारकऱ्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था सुरू केली. आता त्यांच्या पत्नी सुभद्रा राऊत, मुलगा संजय, सून आणि नातू यांनी ही परंपरा चालवत आहेत.
राऊत यांची 5 एकर शेती आहे. वारी सोहळ्यातील तरडगाव येथील मुक्काम हा राऊत आणि कुटुंबीय-नातेवाईकांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा सण असतो. संजय राऊत म्हणतात, “आमच्या वडिलांनी ही सेवा सुरू केली. ती आम्ही पुढे सुरू ठेवली आहे. आमचा मोठा मुलगा माथाडी कामगार, तर धाकटा तरडगाव येथे आरोग्य विभागात आहे. पूर्वी आमची परिस्थिती खूप हलाखीची होती. पक्के घर नव्हते. दोन वेळच्या जेवणासाठीही खूप संघर्ष करावा लागत असे. मात्र, आम्ही वारकऱ्यांची पंगत सुरूच ठेवली. विठू माउलीने आम्हाला भरभरून दिले. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा या हेतूने आम्ही सेवा करतो आहोत.’
कै. नारायण राऊत यांच्या पत्नी सुभद्रा राऊत यांचे वय सध्या 93 वर्षे आहे. लहानपणापासून शेतीकाम केल्याने त्यांची प्रकृती आजही उत्तम आहे. घरातील विविध कामे त्या सहजपणे करतात. वारकऱ्यांसाठी आजही त्या स्वयंपाक बनवतात. “अन्न हे पूर्णब्रह्म आहे. “आम्ही ही सेवा करतो त्यामुळेच विठ्ठलाने माझा संसार सुखाचा केला. माझी सुनही वारकऱ्यांची सेवा करते. वारीला जाता आले नाही, तरी वारकऱ्यांमध्येच विठ्ठलाचे रूप पाहून आम्ही सेवा करतो,’ अशा भावना सुभद्राआजी यांनी दैनिक “प्रभात’कडे व्यक्त केल्या.
बाळकृष्ण महाराज (फणसे) वेल्हे तालुका दिंडी संस्था
ही दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथामागे 88 क्रमांकावर चालते. दिंडीचे हे 36वे वर्ष आहे. बाळकृष्ण महाराज यांनी ही दिंडी सुरू केली. सध्या दिनकरराव धारपळे हे दिंडी संस्थेचे अध्यक्ष असून व्यवस्था पाहतात. किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेले दुर्गम भागातील दापोडे (ता. वेल्हे, पुणे) येथील ही दिंडी आहे. तरडगाव मुक्कामी राऊत कुटुंबाच्या घरी या दिंडीची निवासाची आणि एकवेळ भोजन प्रसादाची सेवा करण्यात येते.