राजगुरूनगर, दि. १९ (प्रतिनिधी): मिरजेवाडी ता. खेड येथे एक तास झालेल्या ढगफुटी सदृष्य अतिवृष्टीमुळे वनविभागाच्या हद्दीत असलेला जाळदेव पाझर तलाव फुटला. यामुळे शेतांमध्ये पाणी जावून शेतीसह पिके वाहून गेली, विहरी गाडल्या गेल्या असून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आज शनिवार (दि.१९) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मिरजेवाडी येथे डोंगरावर सुमारे १ तासभर ढगफुटी झाली. जोरदार पावसात पाझर तलावावरून पाणी उलटल्यामुळे पाझर तलावाची मातीची भिंत मधोमध फुटून पाण्याचा मोठा लोंढा ओढ्याचे पाञ सोडून आजू बाजूच्या शेतीत घुसला. यामुळे शेतीसह उभी पिके वाहून गेली. सोयाबीन, भुईमुग, कांदे, बटाटे या पिकांसह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले.
शेतांचे बांध तुटले, विहरी गाडून गेल्या आहेत. मोटार पाईप वाहून गेले आहेत. मिरजेवाडीतील पाझर तलाव फुटल्याने कैलास जाधव, मुरलीधर जाधव, बाळु जाधव, महादु जाधव, बबन जाधव, अजय बुटे यासह अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी खेड उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवून नुकसानीची पहाणी केली. त्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी सरपंच बाळासाहेब बुट्टे, मंडलआधीकारी सविता घुमटकर, वनपाल रामदास गोकुळे, नवनाथ चव्हाण, अजीत रत्नपारखी उपस्थित होते. एक तास झालेल्या पावसामुळे पाझर तलाव फुटल्याने तलावाच्या खालील शेतकरी हवालदिल झाले होते. यामुळे कोणतीही जीवित्त हानी झाली नसली तरी शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱयांनी नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे.