डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी इन्स्टिट्यूटच्या ऑनलाइन सर्वेक्षणाचे निष्कर्ष
पिंपरी : करोनाचा (कोविड -19) संसर्ग आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी याबद्दल 80 टक्के लोक जागरूक असल्याचे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस ऍण्ड रिसर्च महाविद्यालयाने घेतलेल्या या सर्वेक्षणाला सात राज्यांतील 1717 नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
जगभरात लाखो लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. देशात सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी सुरू आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) करोना या संसर्गजन्य आजाराच्या विविध पैलूंशी संबंधित सर्वेक्षण करण्यासाठी सर्व सदस्य देशांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
सर्वेक्षणात करोनाबाबत नागरिकांमधील जागरूकता आणि जीवनशैलीवर झालेले परिणाम यांचे विश्लेषण करण्यात आले. लॉकडाऊनची मुदत वाढविल्यानंतर 10 दिवसांच्या कालावधीत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या 10 जणांच्या पथकाने हे सर्वेक्षण केले. करोनाचा वाढत जाणारा प्रकोप व संसर्ग रोखण्यासाठी केलेली देशव्यापी टाळेबंदी व बंधने आदींबद्दल भारतीयांमध्ये असलेली जागरूकता व परिणाम याबद्दल महाविद्यालयीन इथिक्स समितीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाविद्यालयाने विविध ऑनलाइन माध्यमांमधून सर्वेक्षण केले.
या सर्वेक्षणामध्ये देशभरातून कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ व महाराष्ट्र येथील 1717 नागरिकांनी सहभाग घेतला. संख्याशास्त्रीय प्रतिसादानुसार 49.35 टक्के प्रतिसाद हा 20 ते 30 वयोगटातील लोकांचा होता. पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेल्या 37.8 टक्के लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. तर, 35 टक्के नोकरदार वर्गाचा त्यासाठी प्रतिसाद मिळाला.
सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार 80 टक्के लोक हे करोनाची साथ आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी याविषयी जागरूक आहेत. तथापि, 13 टक्के लोक हे त्यांच्या शहर अथवा जिल्ह्यातील करोनाशी संबंधित आरोग्य सेवांविषयी पूर्णत: अनभिज्ञ आहेत. करोनाबाबत आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक फार्मासिस्ट हा सर्वसामान्यांना समुपदेशन करण्यासाठी तत्पर असल्याचे 53.8 टक्के प्रतिसादातून पुढे आले.
सद्य:स्थितीत करोनाबद्दलची ऑनलाइन माहिती, विविध माध्यमांतून दिली जाणारी सततची माहिती, कोविडचे उपचार, प्रतिबंधक औषधे अशा विविध गोष्टींमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्वेक्षणातील निष्कर्ष सूचित करतात की, सुमारे 70 टक्के लोक चिंताग्रस्त आहेत. नागरिक केंद्र व राज्य सरकारच्या सर्व उपक्रमांना पाठिंबा देत आहेत. सर्वेक्षणाच्या निष्कर्षात ठळकपणे नमूद केले आहे की, भारतातील आरोग्य सेवांच्या सुविधा व दर्जामध्ये तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे.
संबंधित सर्वेक्षणाचे निष्कर्ष हे नागरिकांकडून प्राप्त झालेल्या प्रतिसादानुसार केवळ अभ्यासासाठी व संशोधनाच्या दृष्टीने प्रकाशित केले आहेत. करोना या जागतिक आपत्तीबाबत राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन सर्वेक्षण केल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मितादेवी जाधव यांनी प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे, डॉ. आशा थॉमस, डॉ. स्नेहा चंदानी व विभागप्रमुख यांचे अभिनंदन केले.