लंडन : गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करोना महामारीने सर्व आर्थिक व्यवस्थाच विस्कळीत करून टाकल्यानंतर आता रोजगाराच्या क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊ लागली आहे. अमेरिकेत गेल्या दोन वर्षांच्या काळात ज्याप्रमाणे राजीनामा देण्याची लाट आली होती. त्याचप्रमाणे भारतामध्ये या वर्षी नोकरी बदलण्याची लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अमेरिकेतील द ग्रेट रेसिग्नेशन प्रमाणेच भारतात द ग्रेट रिशफल ही प्रक्रिया दिसण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारतातील पाच पैकी चार व्यवसायिक नोकरदार येत्या काही महिन्यांमध्ये आपली नोकरी बदलतील असा अंदाज एका सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकेत गेल्या वर्षी सुमारे 4 कोटी लोकांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. ही प्रक्रिया द ग्रेट रेसिग्नेशन म्हणून ओळखली जाते त्याच धर्तीवर आता भारतामध्ये द ग्रेट रिशफल होण्याची शक्यता आहे.
प्रोफेशनल नेटवर्किंग वेबसाईट म्हणून मान्यता असलेला लिंकड इन या वेबसाइटने आणि इंग्लंडमधील सेन्सस वाईड या मार्केटिंग रिसर्च संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. अमेरिका आणि इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये नोकरीचा राजीनामा देण्याचे प्रमाण खूपच कमी असले तरी नवीन नोकरी शोधणाऱ्याचे प्रमाण मात्र खूप आहे, म्हणूनच येत्या काही महिन्यांमध्ये 80 टक्के भारतीय आपल्या नोकऱ्या बदलतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
लिंकड इन वेबसाईटने एकूण 1111 लोकांचा सर्व्हे केला त्यानंतर त्यापैकी 82 टक्के लोकांनी आपण नोकरी बदलणार असल्याची कबुली दिली. नोकरी बदलण्याचा मनस्थितीत असणार्यांमध्ये सर्वात जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्स यांचा समावेश जास्त आहे. जास्त चांगला पगार मिळण्याच्या अपेक्षेने जुनी नोकरी सोडण्याकडे या सर्वांचा कल आहे, त्यामुळे जर ज्या संस्थेत हे लोक काम करत आहेत. त्या संस्थेने त्यांना चांगला पगार ऑफर केला तर ते त्या संस्थेत राहतील असाही निष्कर्ष या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
नजीकच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्था आपल्याकडून लोकांनी नोकरी सोडून इतर संस्थेमध्ये जाऊ नये यासाठी पगारवाढ आणि इतर काही सुविधांचा वापर करू शकतात, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. महामारीच्या काळामध्ये सर्वांचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे भविष्याचा विचार करून अस्तित्व टिकवण्यासाठी आता अशा हालचाली केल्या जाऊ लागल्या आहेत.