गोंदवले – वॉटरकप जिंकलेल्या शिंदी खुर्द, भांडवली या गावासह मलवडी, सत्रेवाडी, शिरवली, गाडेवाडी, कळसकरवाडी, परकंदी, वारुगड या गावांत मुसळधार पावसाने रात्रभर झोडपून काढले. या गावातील सीसीटी, डीप सीसीटी, नालाबांध तलाव पूर्णपणे भरुन वाहिले. तर आंधळी धरणापासून वरच्या बाजूला माणगंगा दुथडी भरुन वाहिल्याने गेली 7 वर्ष कोरडाठाक असलेल्या आंधळी धरणात पाण्याची आवक सुरु झाली आहे. सोमवारी रात्री 9 वाजल्यापासून माण तालुक्यात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. रात्रभर कमी जास्त पाऊस सुरु होता. पहाटे 2 वाजल्यापासून पावसाचा जोर प्रचंड वाढला.
माणगंगा नदीच्या उगमाजवळील गाडेवाडी तलाव भरला असून शिंदी, भांडवलीपासून माणगंगा दुथडी भरुन वाहू लागली. त्यामुळे परकंदी – मलवडी रस्ता त्यानंतर मलवडी-दहिवडी -खडकहिरा ओढा व आंधळी गावातील नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद होती. आंधळी धरणात दहिवडी, बिदालला पाणीपुरवठा करणारी विहीर पाण्याखाली गेली आहे. धरणात पाण्याची आवक होत असून पाणी पातळी झपाट्याने वाढत आसल्याने बिदाल, दहिवडी, गोंदवले या पाणी पुरवठा होणाऱ्या या गावांना दिलासा मिळाला आहे.
माण तालुक्यात सर्वात जास्त पाऊस मलवडी मंडलात 80 मिलिमीटर झाला असून त्यानंतर दहिवडी 38, गोंदवले 13, म्हसवड 42, मार्डी 17 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वात कमी पाऊस शिंगणापूर 4 व कुकडवाडमध्ये 2 मिलिमीटर पाऊस पडला आहे. आजपर्यत तालुक्यात सरासरी 239 मिलिमीटर पाऊस पडला असून सगळ्यात कमी आजपर्यतचा शिंगणापूर मंडलात 45 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तालुक्याच्या इतर भागातही पाऊस पडणे आवश्यक आहे.