80 लाख लोकांनी मोबाइल केला बंद
मुंबई – करोना व्हायरसच्या काळात भारतातील 80 लाख लोकांनी मोबाइल वापरणे बंद केले. दूरसंचार नियामक अधिकारी म्हणजे ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
ज्यांनी मोबाइल बंद केले, त्यामध्ये शहरवासीयांचा वाटा जास्त आहे. एप्रिल महिन्यात 80 लाख शहरवासीयांनी मोबाइल कनेक्शन बंद केले. एप्रिलमध्ये शहरातील लाखो स्थलांतरित मजूर गावी परत जात होते. या कालावधीत हे मोबाइल डिस्कनेक्ट झाले असण्याची शक्यता आहे. या कालावधीत लोकांना सहजासहजी चार्जिंग करता येत नव्हते. त्यामुळे मोबाइल वापरतात नसण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यामध्ये केवळ उत्तर प्रदेशामध्ये मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या सव्वा टक्क्यांनी वाढली.
इतर सर्व राज्यांमध्ये मात्र मोबाइल वापरणाऱ्यांच्या संख्येत घट नोंदली गेली. एप्रिल महिन्यामध्ये वोडाफोन, आयडिया कंपनीने 45 लाख ग्राहक गमावले. तर एअरटेलने 52 लाख ग्राहक गमावले. या महिन्यात जिओने केवळ 16 लाख नवे ग्राहक जोडले.
गेल्या दोन वर्षात प्रथमच एखाद्या महिन्यात जिओचे एवढे कमी ग्राहक झाले आहेत. आता जिओचा भारतातील मोबाइल बाजारपेठेतील वाटा 33.85 टक्के, एअरटेलचा वाटा 28.46 टक्के तर वोडाफोन आयडियाचा वाटा 27.37 टक्के आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भारतामध्ये 117 कोटी 79 लाख मोबाइल कनेक्शन होती. एप्रिलमध्ये ही संख्या कमी होऊन 116 लाख 94 कोटी इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील आणि शहरातील बऱ्याच मोबाइलधारकांना आपला फोन रिचार्ज करता आला नाही.
खेडुतांची आगेकूच
शहरी भागात मार्चअखेर 65 कोटी 64 लाख मोबाइलधारक होते. ती संख्या कमी होऊन 64 कोटी 71 लाख इतकी झाली आहे. मात्र, ग्रामीण भागांमध्ये मार्चअखेरीस 52 कोटी 15 लाख मोबाइलधारक होते. एप्रिलअखेर ही संख्या वाढून 52 कोटी 22 लाख इतकी झाली आहे. बरेच कामगार शहरातून ग्रामीण भागात गेल्यामुळे आकडेवारीत हा फरक झालेला असू शकतो.