नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. उपचारांसाठी लागणारी संसाधने कमी पडत आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजनचा देशात तुटवडा आहे. अशातच दिल्लीतील बत्रा रुग्णालयातील आठ जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
रुग्णालयाने हायकोर्टात यासंदर्भातील माहिती दिली आहे. करोनाच्या सध्याच्या एकंदर परिस्थितीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी बत्रा रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या रुग्णालयातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. ऑक्सिजनचं संकट वाढलं आहे. ज्यामुळे आठ जणांचा जीव गेला आहे. यात एका डाॅक्टरचाही समावेश आहे. असे बत्रा रुग्णालयाकडून कोर्टात सांगण्यात आले.
कोर्टाने दिल्ली सरकारला ऑक्सिजन, मेडिसीन आणि बेड उपलब्धतेबाबत अनेक प्रश्न विचारले. संकटात सरकार लष्कराची मदत का घेत नाही आहे, अशी विचारणा देखील कोर्टाने केली. आर्मीकडे त्यांची संसाधनं असतील. आपली सेना निश्चितच ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी दुसरा चांगला पर्यायी मार्ग देऊ शकतात. आम्ही तीन दिवसांपासून त्यांची मदत घ्या म्हणून सांगत आहोत. पण तुम्ही संकोच का करत आहात. विना ऑक्सिजन बेड्सचा फायदा नाही, असं सांगण्याऐवीज सैन्याची मदत घेण्याचा विचार करावा, असं कोर्टाने सांगितलं.