तालुक्यात करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या १५ वर पोहचली..
राजगुरुनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यात आज नव्याने ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली. तालुक्यात करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या १५ वर पोहचली असून या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
खेड तालुक्यातील चासची पापळवाडी येथील बाधित १ व कडुस, वडगांव पाटोळे येथील बाधितांशी संपर्क आलेल्या ७ अशा ८ व्यक्तींचा अहवाल मंगळवारी (दि२६) पॉझिटिव्ह आला आहे. खेड तालुक्यामधील मधील पहिले ७ व आजचे ८ असे मिळुन कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या १५ झाली आहे. याशिवाय कडूस गावामधून मुंबईला गेलेला एक व्यक्ती मुंबईत पॉझिटिव्ह सापडला आहे. चाकणच्या खराबवाडी परिसरातील कंपनी मध्ये कामगार असलेली एक महिला पुण्यात पॉझिटिव्ह आढळली आहे. हे दोन रुग्ण जमेत धरल्यास खेड तालुक्यातील रुग्णांचा आकडा १७ वर पोहचला आहे. या वाढत्या संख्येमुळे मुंबईचे कनेक्शन आता खेड तालुक्यातील गावागावात पोहचत आहे अशी भीती व्यक्त होत आहे.
मुंबई मधून ४थ्या लॉकडाऊन झाल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक त्याच्या तालुक्यातील मूळगावी आल्याने करोनाचा धोका गंभीर रूप घेत आहे. यातुन ग्रामीण भागातील गावोगावच्या नागरिकांचे धाबे दणाणले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर केवळ मे महिन्यात मुंबईतील जवळपास साडेचार हजार नागरिक खेड तालुक्याच्या विविध गावात आले आहेत.
कडुस ता खेड येथील मुंबईत पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यापैकी कडुस मधील ३, आणि वडगांव पाटोळे येथील बाधिताच्या संपर्कात आलेल्या पैकी वडगांव मधील १ व कुरकुंडी मधील ३ अशा ७ व्यक्तीचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी खेड तालुक्यात राजगुरूनगर जवळील राक्षेवाडीत ५,चाकणच्या झित्राई मळ्यात १, वडगांव पाटोळे १ अशा ७ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कारोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या पाईट २, राजगुरूनगर १, कडूस १, असे ४ जणांचे स्वब रिपोर्ट येणे बाकी असून आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती मध्ये कमान १,कोहिनडे १, पापळवाडी ५ असे एकूण ११ स्वब रिपोर्ट येणे बाकी आहेत.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी सांगितले कि, तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत आता वाढ होत आहे. आरोग्य विभाग त्या दृष्टीने काम करीत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सुरु आहे. मुंबई मधून आलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. घरातच थांबावे. आपले कुटुंब आणि गावाला या आजरापासून रोखण्याचा प्रयत्न करावा व प्रशासनाला सहकार्य करावे
सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले कि, जिल्ह्यात रुग्णाची संख्या वाढत आहेत त्याप्रमाणे ग्रामीण भागातही हि संख्या वाढत असल्याने म्हाळुंगे येथील म्हाडाच्या इमारतीत कोव्हीड केअर सेंटर सुरु तत्काळ करण्याबाबत आणि त्यासाठी आवश्यक डॉक्टर व इतर कर्मचारी यांची उपलब्धता याबाबत आज पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. कोव्हीड केअर सेंटर दोन दिवसात सुरु करण्यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा सुरु आहे. येथील सेंटर लवकरच सुरु होईल.
चासच्या पापळवाडीत ६ जणांचे कुटुंब तेरा दिवसांपूर्वी मुंबईतून गावात आले होते. सर्व जण तंतोतंत होम कवारंटाईनचे पालन करीत होते. कुटुंब प्रमुख व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने सोमवारी (दि २५) स्वतःच्या वाहनाने औंध रुग्णालयात गेले. येथे तपासणी करता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उर्वरित कुटुंब सदस्यांना तपासणीसाठी नेण्यात आले आहे .बाधित रुग्ण आढळत असलेल्या गाव परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.