ठाणे- पालघरमध्ये झालेल्या सामूहिक हत्याप्रकरणी राज्याच्या “सीआयडी’ने आणखी 8 जणांना अटक केली आहे. यामुळे याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 186 इतकी झाली आहे. त्यामध्ये 11 अल्पवयीनांचा समावेश आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बुधवारी पोलिसांनी 24 जणांना अटक केली होती. त्यानंतर आज आणखी 8 जणांना अटक करण्यात आली. एप्रिल महिन्यात तिघाजणांवर जमावाने हल्ला झाला, तेव्हा हे सर्वजण घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, त्यांनी जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. यातील काही लोक या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करीत होते आणि काही जण गोंधळामध्ये सामील झाले होते. आरोपींच्या हातात काठ्याही होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
16 एप्रिल रोजी दोन साधू आणि त्यांचा चालक कारमधून मुंबईहून सुरतकडे जात होते. ते लहान मुलांना पळवणारे असल्याची शंका घेऊन पालघरच्या गडचिंचले गावात जमावाने त्यांना मारहाण केल्याने या तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सीआयडीने तीन आरोपपत्र दाखल केली आहेत. अटक केलेल्यांपैकी 101 आरोपींच्या जामीनअर्जावर 3 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.