संगमवाडी, येरवडा येथील स्मशानभूमीत “वेटिंग’वर पर्याय
करोना बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी आता चार दाहिनी
– अंजली खमितकर
पुणे – करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, त्या पार्थिवांसाठी कैलास आणि येरवडा येथील स्मशानभूमीत मिळून एकूण 8 शीतपेट्या बसवण्यात आल्या आहेत. त्यांचे टेस्टिंग झाले असून, शनिवारपासून (दि. 4) त्या कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामुळे रुग्णालयातील जागाही रिकामी होऊन, नातेवाईकांनाही ताटकळत थांबावे लागणार नाही.
डॉ. नायडू सांसर्गिक, ससून किंवा खासगी रुग्णालयांत करोना बाधिताचा मृत्यू झाल्यास त्याला डिस्चार्ज देऊन प्रक्रिया पूर्ण केली, तरी स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत “वेटिंग’ असते. शिवाय ऍम्ब्युलन्सही उपलब्ध होत नसल्याने पार्थिव रुग्णालयांत अनेक तास ठेवावे लागत आहे. पार्थिवाबरोबर नातेवाईकांनाही तेथे थांबावे लागत आहे.
पार्थिव आणलेल्या ऍम्ब्युलन्सही तेथे रांगेत थांबलेल्या असतात. त्यामुळे अन्य पार्थिव आणण्यासाठी त्यांना जाता येत नाही. पर्यायाने रुग्णालय, नातेवाईक यांची कसरत होते. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
सध्या कैलास स्मशानभूमीत सहा आणि येरवडा स्मशानभूमीत दोन अशा एकूण आठ शीतपेट्या बसवण्यात आल्या आहेत. चार अंश सेल्सियस असे त्याचे तापमान असणार आहे. शुक्रवारी त्याची चाचणी घेण्यात आली. वजा चार आणि अधिक चार एवढे अंश सेल्सिअस तापमानावर या शीतपेट्या कार्यान्वित राहू शकतात.
तर, येरवडा आणि कैलास येथील एकेक विद्युत दाहिनी आजपर्यंत करोनाबाधित मृतकांसाठी देण्यात आली होती. मात्र, आता दोन्ही विद्युत दाहिन्यांमध्ये कोविड मृतकांचे दहन करण्यात येणार आहे.
करोनाबाधित मृतांचे पार्थिव नेण्यासाठी सहा ऍम्ब्युलन्स उपलब्ध आहेत. त्या स्मशानभूमीत थांबल्यानंतर अन्य मृतकांना नेण्यासाठी वेळेत ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नव्हती. मात्र, आता शीतपेट्यांमुळे ऍम्ब्युलन्सना “वेटिंग’ची गरज राहणार नाही. याशिवाय पार्थिवांच्या दहनाला लागणारा वेळही कमी होईल.
– श्रीनिवास कंदूल, विद्युत विभागप्रमुख, मनपा