नगर – महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभाग कार्यालयांतर्गत वीजचोरीविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत नाशिक परिमंडळात नगर जिल्ह्यातील 794 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून यामध्ये 1 कोटी 3 लाख 39 हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कोकण प्रादेशिक विभागात कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचा समावेश होतो. महावितरणच्या एकूण महसूलात या विभागाचे जवळपास 43 टक्के योगदान आहे. प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विभागातील सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत आढावा बैठक घेऊन विविध निर्देश दिले.
वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करणे, नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून तातडीने बदलणे, नवीन वीजजोडणी वेळेत देणे, उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून उर्वरित कृषिपंपांना वीजजोडणी देण्याच्या कामांना गती देण्याबाबत निर्देश देतानाच त्यांनी सध्या सुरु असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच कोकण प्रादेशिक विभागात वीज हानीच्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागातील वीजचोरीला आळा घालण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याचे आदेश त्यांनी दिले.
या मोहिमेत सातत्य ठेवून ही मोहीम उत्तरोत्तर अधिक तीव्र करण्याबाबतही सूचित केले. नाळे यांनी दिलेल्या आदेशानुसार वीजचोरीविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत नगर जिल्ह्यातील नगर ग्रामीण विभागात 241 जणांकडे 13 लाख 69 हजार रुपये, नगर शहर विभागात 60 जणांकडे 17 लाख 69 हजार रुपये, कर्जत विभागात 100 जणांवर कारवाईमध्ये 32 लाख 24 हजार रुपये, संगमनेर विभागात 326 जणांकडे 25 लाख 2 हजार रुपये आणि श्रीरामपूर विभागात 67 जणांवर कारवाई करून 14 लाख 75 हजार रुपयांची चोरी आढळली आहे.
अशी एकूण जिल्ह्यात 794 जणांवर कारवाई करण्यात आली असून जवळपास 1 कोटी 3 लाख 39 हजार रुपयांची चोरी झाल्याचे आढळले आहे. या मोहिमेत मीटरमध्ये छेडछाड, मीटर टाळून विजेचा वापर तसेच वीजतारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी होत असल्याचे प्रामुख्याने आढळून आले आहे. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत नगरचे धीक्षक अभियंता संतोष सांगळे व कार्यकारी अभियंते एन. बी. धर्माधिकारी, प्रकाश जमदाडे, मनीषकुमार सूर्यवंशी, प्रशांत मासाळ, एस. के. बंड, दत्तात्रय गोसावी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र सहभागी असून आणखी मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबविली आहे.
विजेचा अनधिकृत वापर टाळा
कलम 135 व 126 नुसार वीजचोरी करणाऱ्याला तीन वर्षापर्यंचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही क्लृप्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये. तसेच आकडे टाकून वीजचोरी करणे थांबवून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. विजेचा अनधिकृत वापर टाळून संभाव्य कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी नागरिकांना केले.