नवी दिल्ली : भारत सरकारने देशातील कांदा टंचाईवर मात करण्यासाठी विदेशातून कांदा आयातीचा निर्णय घेतला असून त्यातील 790 टनांची पहिली आयात झाली आहे. हा कांदा दिल्ली आणि आंध्रप्रदेशात पाठवला जाणार आहे. याची किंमत 57 ते 60 रूपये इतकी आहे.
येत्या डिसेंबर अखेरपर्यंत एकूण 12 हजार टन कांदा भारतात जहाजाद्वारे पोहचणार आहे. सरकारी मालकीच्या एमएमटीसी मार्फत हा कांदा आयात केला जात असून सरकारने त्यांना एकूण 49 हजार 500 टन कांदा आयात करण्यास अनुमती दिली आहे. त्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने ही आयात केली जात आहे.
देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कांद्याची सध्या तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी देशात नव्याने उत्पादित झालेला कांदा बाजारात उपलब्ध होत असला तरी चढे भाव मात्र अजून कायम आहेत. विदेशातून मोठ्या प्रमाणात कांदा आयात झाल्यानंतरच हे भाव काही प्रमाणात खाली येऊ शकतील.