मुंबई – अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे 755 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याचा राज्यातील अंदाजे 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन आणि अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे 4 हजार 500 कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी 1500 कोटी रुपये राहिली असती. आता निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार आहे.
काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 489 हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील 36 हजार 711.31 हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील 74 हजार 446 हेक्टर असे एकूण 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे 755 कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना दिलासा
आतापर्यंत सुमारे 3 हजार 900 कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे 30 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे 30 लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या 755 कोटीच्या निधीमुळे अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
आतापर्यंत सुमारे 3 हजार 954 कोटी रुपयांचा मदत निधी वितरित
राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार 8 सप्टेंबर 2022 रोजी सुमारे 3445.25 कोटी आणि 56.45 कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास 98.58 कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार 354.07 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.