मुंबई- वंदेभारत अभियानांतर्गत 78 विमानांनी 12974 प्रवासी विविध देशातून मुंबईत दाखल झाले. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 4841 इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4119 इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4014 इतकी आहे. 1 जुलैपर्यंत आणखी 80 विमानांनी मुंबईत प्रवासी येणे अपेक्षित आहे.
आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलॅंड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलॅंड, कतार, हॉंगकॉंग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विड, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो या देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयात गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वॅरंटाईन केले जात आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्यांना मुंबईत क्वॅरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते व त्या प्रवाशांचा प्रवासी वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.