भारताशी झालेला करार कायम राहणार का?
नवी दिल्ली – सौदी अरेबिया व चीन यांच्यात रिफायनरी आणि पेट्रोकॉम्प्लेक्सची निर्मिती करण्याचा करार गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला होता. चीनचा हा महत्त्वाकांशी करार सौदीच्या अरामकोने मोडला आहे. हा करार मोडल्याने चीनला 10 अब्ज डॉलरचा म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास 75 हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
या करारानुसार अरामको कंपनी चीनच्या मदतीने एक रिफायनरी आणि पेट्रोकॉम्प्लेक्स प्लॅन्टची निर्मिती करणार होती. हा करार रद्द होणे हा चीनसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का मानला जात आहे. करोनाचा धोका वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड घट झाली. त्यामुळे तेल कंपन्यांचे नुकसान झाले. हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज बांधून अरामकोने चीनबरोबरील करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
जगभरातील तेल कंपन्यांची अवस्था समान आहे. घटलेली मागणी आणि घसरणारे तेलाचे दर यांमुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सौदी अरब आणि चीन यांच्यातील रिफायनरी आणि पेट्रोकॉम्प्लेक्सची निर्मिती करण्याचा करार गेल्या वर्षीच झाला होता. भारताबरोबर झालेल्या 44 अब्ज डॉलरच्या कराराचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मेगा रिफायनरी प्रकल्पात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे.