नवी दिल्ली – देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 74 कोटी 30 लाख इतकी झाली आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली आहे.
गेल्या वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यावर्षी इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 3.4 टक्क्यांनी वाढली आहे. या बाजारपेठेतील तब्बल 52.3 टक्के वाटा रिलायन्सचा आहे तर 23.8 टक्के वाटा भारती एअरटेल या कंपनीचा आहे.
वायरलेस इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 72 कोटी 7 लाख म्हणजे 97 टक्के आहे. याचा अर्थ मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर जास्त केला जातो. संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या केवळ 2 कोटी 24 लाख इतकी आहे. या आकडेवारीबाबत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे एकूण इंटरनेट वापर करणाऱ्यांपैकी तब्बल 92.5 टक्के लोक ब्रॉड बॅंडच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करतात. हे इंटरनेट वेगवान असते.
महाराष्ट्र सर्वांत पुढे
इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र सर्वांत पुढे आहे. महाराष्ट्रात 6 कोटी 30 लाख लोक इंटरनेट वापरतात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात 5 कोटी 86 लाख, उत्तर प्रदेशात 5 कोटी 46 लाख, तमिळनाडूत 5 कोटी 16 लाख, मध्य प्रदेशात 4 कोटी 87 लाख लोक इंटरनेट वापरतात.