नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन आणि पियूष गोयल यांच्यासह राज्यसभेचे 72 खासदार आज निवृत्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी निवृत्त खासदारांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली.
राज्यसभेचे जे खासदार आज निवृत्त झालेत. त्यात अर्थमंत्री निर्मला सितारामन, उद्योग मंत्री पियूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, कपिल सिब्बल, पी. चिदंबरम, जयराम रमेश, ए. के. अटोनी, आरसीपी सिंग आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती नियुक्त डॉ. नरेंद्र जाधव हेही आज निवृत्त झाले.
याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निवृत्त झालेल्या खासदारांकडे ज्ञान आणि अनुभवाचा खजिना आहे. खासदारांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला कसा होईल? याचा विचार करण्यास सांगितले. सर्वांनी आपले अनुभव लेखणीबध्द करावे आणि इतरांना प्रेरित करावे असे सांगत पंतप्रधानांनी सर्वांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली.
मोदी म्हणाले की, अनुभव हा ज्ञानापेक्षा जास्त मौल्यवान असतो. ज्ञानाची एक मर्यादा आहे. अनुभवाची शक्ती फार मोठी असते. ज्ञान संमेलनात बोलताना उपयोगी पडते. परंतु, अनुभवात मोठमोठ्या समस्यांचे निराकरण करण्याची शक्ती असते. अनुभवामुळे चुकाही कमी होतात, असेही ते म्हणाले.
निवृत्त खासदार दीर्घकाळापर्यंत या सभागृहात राहिले आहेत. त्यांचा अनुभव देशाच्या विकासासाठी कामी येणार आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून येणारे खासदार त्या त्या भागाच्या भावनेची जाणीव या देशाला करून देतात. म्हणून निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी पुन्हा परत यावे, अशी आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले.
खासदारांनी आपले अनुभव लिपीबध्द करायला पाहिजे. याचा फायदा भावी पिढीला होईल. या देशाला नवी दिशा देण्याचे कार्य आपल्यापैकी प्रत्येकाने केले असेल. यास संग्रहित केले तर हा मोठा ठेवा असेल, असेही त्यांनी सांगितले.