डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारतात होणार दाखल
100 पार गेलेले दर आवाक्यात आणण्याचा प्रयत्न
पुणे – केंद्र सरकारने इजिप्तकडे 6 हजार 90 टन कांदा आयातीची मागणी नोंदविली आहे. हा कांदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारतात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. हा कांदा न्हावा-शेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदरात येणार आहे.
देशाला लागणाऱ्या एकूण कांद्यापैकी महाराष्ट्रात निम्मा कांदा पीकविला जातो. मात्र, महाराष्ट्राला अवकाळी व पुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले आहे. लागवड केलेला कांदा हाती लागला नसून त्याची आवक होण्यास आणखी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे राज्यात कांद्याने 100 पार केली आहे. तर कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी राज्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या नाशिकमधील लासलगावच्या व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्स विभागाने धाडी घातल्या होत्या. मात्र, त्यामधून फारसे काही निष्पन्न झाले नाही.
केंद्रीय ग्राहक कार्य सचिव अविनाश के. श्रीवास्तव यांनी दोन दिवसांपूर्वी विविध राज्य सरकारांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून प्रत्येक राज्यातील कांद्याच्या मागणीची पडताळणी केली. तत्पूर्वी श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात एक पत्रही लिहिले होते. या कांद्याची वाहतूक गरज भासल्यास नाफेडमार्फत केली जाणार आहे. प्रत्यक्षात आयातीत कांदे ग्राहकापर्यंत डिसेंबरच्या सुरवातीला पोहोचू लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा कांदा देशभरात वितरित केला जाणार आहे.
आयात कांदादेखील ग्राहकांच्या अवाक्याबाहेर?
देशातील राज्य सरकारांनी हा कांदा 52 ते 55 रुपये प्रति किलो या दरांनी ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा यासाठी ही आयात केली जात आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध होणारे कांद्याचे दर काही फरकानेच अधिक आहे. त्यामुळे इजिप्तचा कांदादेखील सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असणार आहे.