पुणे : देशात कोरोनाने कहर माजविला असून नागरिक सुरक्षितता, रोजगार यांचा विचार करुन सुरक्षित स्थळी व आपआपल्या गावी स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परराज्यातुन महाराष्ट्रात 7 हजार 784 बालके स्थलांतरित होऊन आले असल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे.
शालेय शिक्षण विभागाने शाळाबाह्य व स्थलांतरित बालकांचा शोध घेण्यासाठी सर्व्हेक्षण मोहीम हाती घेतली होती. मार्च महिन्यात 10 दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले. जिल्हानिहाय अहवाल तयार करुन ते प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आले. अहवालातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना मोठी कसरतच करावी लागली.
परराज्यातुन महाराष्ट्रातही बालकांचे स्थलांतर झाले आहे. यात मुले 4 हजार 172 व मुली 3 हजार 612 आढळून आली आहेत. अहमदनगर मध्ये सर्वाधिक 937 बालके इतर राज्यातून स्थलांतरित झाली आहेत. पुणे जिल्ह्यात स्थलांतरित होऊन आलेली 273 बालके आहेत.
विविध जिल्ह्यात स्थलांतरित होऊन आलेली 33 हजार 560 बालके आढळली असून यात मुले 18 हजार 130 तर मुली 15 हजार 430 आहेत. अहमदनगरमध्ये सर्वाधिक 5 हजार 723 बालके स्थलांतरित होऊन आली असून यात मुले 3 हजार 112 तर मुली 2611 आहेत. सर्वात कमी म्हणजेच केवळ 49 बालके मुबंई उपनगरात स्थलांतरित होऊन आलेली आहेत.
पुणे जिल्ह्यात स्थलांतरित होऊन आलेली एकूण बालके 3 हजार 329 असून यात मुले 1 हजार 827 तर मुली 1 हजार 502 आहेत. प्रामुख्याने अहमदनगर, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यात स्थलांतरित होऊन आलेल्या बालकांचे प्रमाण अधिक आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विशेष गरजाधिष्टीत बालके 136 आढळून आलेली आहेत. परगावातून, इतर तालुक्यातुन स्थलांतरित होऊन आलेली 8 हजार 941 बालके सापडली आहेत. परजिल्ह्यातून एकूण 16 हजार 865 बालके स्थलांतरित होऊन आली आहेत. यात मुले 9 हजार 241 तर मुली 7 हजार 624 आढळल्या आहेत.
प्रत्येक गावात व शहरात, परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्टेशन, बसस्थानके, ग्रामीण भागातील बाजार, गु-हाळ घर, गावाबाहेरची पालं, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरित कुटुंबे, झोपड्या, फुटपाथ, सिग्नलवर व रेल्वेमध्ये फुले व अन्य वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भिक मागणारी बालके, लोककलावंताची वस्ती, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, भटक्या जमाती, तेंदूपत्ता वेचणारी, विड्या वळणारी इत्यादी विविध ठिकाणी काम करणारे बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळ्यांवरील आणि जंगलातील वास्तव्य असलेल्या पालकांची बालके, मागास, वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील मुले यांची माहिती या शोध मोहिमेत घेण्यात आली.
जिल्ह्यात स्थलांतरित होऊन आलेली बालके
मुबंई उपनगर – 49, मुबंई – 218 , ठाणे -2259, रायगड – 1447 , पालघर – 1672, पुणे – 3329, सोलापूर – 378 , अहमदनगर – 5723, कोल्हापूर – 2192, सातारा – 2691 , सांगली – 2141, रत्नागिरी – 1707, सिंधुदुर्ग -1082 , नाशिक -886 , धुळे – 214, नंदुरबार – 608, जळगाव-540 , जालना -415, बीड – 442, परभणी – 290, हिंगोली – 143, लातूर – 301, उस्मानाबाद – 216, नांदेड -111 , अकोला -1398 , वाशिम -54 , यवतमाळ -216 , नागपूर – 784, भंडारा – 343, गोंदिया – 421, चंद्रपूर -479 , गडचिरोली -168 , वर्धा -754 .