कोलकाता – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यात केलेल्या भाषणांतील दाव्यांची तृणमुल कॉंग्रेसचे नेते डेरेक ओब्रीयन यांनी पोलखोल केली असून या टुरिस्ट गॅंगच्या नेत्याने आपल्या भाषणात सात खोटे दावे केले असल्याची तपशीलवार माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर दिली आहे.
ममता बॅनर्जींच्या सरकारने राज्यात आयुष्यमान भारत आणि पीएम किसान योजनेचा लाभ नागरीकांना मिळू दिला नाही असा आरोप अमित शहा यांनी केला होता. तो आरोप खोडून काढताना ओब्रीयन यांनी म्हटले आहे की आयुष्यमान भारत योजना लागू होण्याच्या आधीच ममतांच्या सरकारने राज्यातील नागरीकांना आरोग्य विमा योजना पुरवली आहे.
त्यानुसार राज्यातील 1 कोटी 40 लाख लोकांना पाच लाखांच्या आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्यात आला असून पश्चिम बंगाल सरकारची ही योजना आयुष्यमान भारत योजनेपेक्षा अधिक उपयुक्त आणि प्रभावशाली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेपेक्षाही राज्यात अधिक चांगली योजना सुरू असून त्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर पाच हजार रूपयांची मदत दिली जात आहे.
पीएमकेअर अंतर्गत केवळ प्रति एकर 1214 रूपये दिले जात आहेत. त्यामुळे ममतांच्या सरकारने केंद्राच्या या योजना धुडकाऊन लावल्या आहेत. केंद्राने गरीबांसाठी दिलेले अन्नधान्य ममतांच्या सरकारने गरीबांपर्यंत पोचू दिले नाहीं असा आरोपही अमित शहा यांनी केला होता तो आरोपही त्यांनी आकडेवारीसह धुडकाऊन लावला आहे.