नवी दिल्ली – यावर्षी संपूर्ण देशात आतापर्यंत 7 टक्के जास्त पाऊस झाला आहे आणि नैऋत्य मोसमी पाऊस देशात सर्वत्र मुबलक प्रमाणात झाला आहे. तसेच इतक्या लवकर पावसाचा देशातून मुक्काम हलण्याची शक्यताही नाही, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने आज वर्तविला आहे.
यंदा वरूणराजाने शेतकरी बांधवांवर खूप चांगली कृपा केली आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे पिकांना त्याचा लाभ होणार असून भारतीय अर्थव्यवस्थेलाही चांगलीच मदत मिळणार आहे. मात्र या पावसाचा नेमका किती फायदा अर्थव्यवस्थेला होईल, याविषयी नेमकी आकडेवारी सध्या तरी देता येणार नाही. तसेच त्याचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी स्पष्ट केले आहे.
देशामध्ये सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बहुतेक भागात पाऊस विश्रांती घेईल. सामान्यपणे 17 सप्टेंबरपासून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होत असतो. मात्र वायव्य आणि मध्य भारतामध्ये 17 सप्टेंबरपासून पावसाची पुन्हा हजेरी लागण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. डॉ. एम. राजीवन आणि हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. एम महापात्रा यांनी एका आभासी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
अतिवृष्टीचा अंदाज वर्तवताना हवामानशास्त्र विभाग 80 टक्क्यांपेक्षा जास्त अचूक असल्याचे सिद्ध झाल्याचे सांगून अम्फान चक्रीवादळाचा अचूक अंदाज खूप आधीच वर्तविल्यामुळे जीवितहानी तसेच मालमत्तेची हानी होण्यापासून वाचण्यास मदत झाली. तथापि पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला येवून धडकणाऱ्या चक्रिवादळाचा प्रकार वेगळा असल्याने त्यांचा मागोवा घेवून त्याविषयी अंदाज घेणे अतिशय अवघड असते, असे त्यांनी सांगितले.