वेल्हे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वेल्हे तालुक्यातील ८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर राहिलेल्या एका रुग्णाचा अहवाल येणे बाकी आहे.
वेल्हे तालुक्याच्या पानशेत परिसरातील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा अहवाल १४ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीच्या संपर्कातील निगडे मोसे व ओसाडे परिसरातील ७ जणांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने वेल्हे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विलगीकरणातील सर्वांची वैद्यकीय तपासणी करून कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळवले.
या यशात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत असलेले आरोग्य पथक, आशा स्वयंसेविका, प्राथमिक शिक्षक, आरोग्य सेवक, परिचारिका व पोलीस प्रशासनाचा मोलाचा सहभाग होता.
यावेळी बोलताना वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे म्हणाले, “वेल्हे तालुक्यातील ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सिंबॉयोसिस रुग्णालयातील १, भारती हॉस्पिटलमधील १ व नवले हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले ५ रुग्णांची तीनवेळा तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज १६ व्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर एका रूग्णाचा दोन अहवाल निगेटीव्ह आले असून तिसरा अहवाल आल्यानंतर घरी सोडण्यात येणार आहे.
वेल्हे तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोचला आहे.” दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुदर्शन मालाजुरे म्हणाले,” पानशेत परिसरातील ४०३ जणांना विलगीकरण कक्षात हलवले असून कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९२ जणांचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले होते. त्यापैकी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
संबंधित पॉझिटिव्ह रुग्णांवर पुण्यात उपचार चालू होते. आज ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही तालुक्यासाठी आनंदाची बातमी आहे.
प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजना
1) वेल्हे तालुका प्रशासनाने कोरोनाबाधितांमुळे पानशेत परिसरातील दोन गावे व वेल्हे भागातील ३ किमीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून कडक
अंमलबजावणी केली.
2) तालुक्यात महत्त्वाच्या मार्गावरील १८ ठिकाणी नाकाबंदी करत बाहेरील लोकांना पूर्ण अटकाव करण्यात यश मिळवले.
3) वेल्हे तालुक्यात सर्दी, खोकला व ताप यासारख्या साध्या आजारांवर उपाय करण्यासाठी पाच फ्ल्यू क्लिनिकची उभारणी केली.
4) विलगीकरण केलेल्या संशयित लोकांची नियमित आरोग्य तपासणी केली.
5) ग्रामदूत नेमून गावातील लोकांना घरपोच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला.
6 ) गोरगरीब जनतेसाठी दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा मोफत पुरवठा करण्यात आला.
7) ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी नागरिकांना मास्कसॅनिटायझर मोफत वाटप करण्यात आले.