नवी दिल्ली : लोकसभेतील कॉंग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन बुधवारी मागे घेण्यात आले. त्याविषयीचा ठराव सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा विश्रामानंतर 2 मार्चपासून सुरू झाला. मात्र, त्या टप्प्याच्या प्रारंभापासूनच लोकसभेचे कामकाज गदारोळामुळे ठप्प झाले. कामकाजात अडथळे आणून गैरवर्तन केल्याबद्दल कॉंग्रेसच्या सात खासदारांवर 5 मार्चला कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
त्यानुसार त्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. ती कारवाई मागे घेण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.
दरम्यान, गदारोळामुळे व्यथित झालेले लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवसानंतर सभागृहात येण्याचे टाळले होते. मात्र, ते बुधवारी लोकसभेत उपस्थित राहिले.