तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या थांबणार : मोबाइल ऍपद्वारे फोटो काढून अपलोड करता येणार
पुणे – शेतात पेरलेल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन मोबाइल ऍपद्वारे फोटो काढून तो अपलोड करणार आहे. या मोबाइल ऍपमध्ये अक्षांक्ष व रेखांशची नोंद होणार असल्याने शेताचे स्थानही समजणार आहे. त
तलाठ्यांकडून या फोटो व स्थानाची पडताळणी होणार असून त्यानंतर शेतातील पिकांची नोंद संबधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राज्यातील बारामतीसह सहा तालुक्यांमध्ये राबवण्यात येत आहे. लवकरच मोबाइल ऍपद्वारे पिकांची नोंद घेण्याची पद्धत राज्यात लागू केली जाणार आहे.
गाव पातळीवरून पीकपेरणी अहवालाचा खरोखर व वास्तववादी माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच ही माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे, याहेतूने पीक पेरणीबाबतची माहिती मोबाइल ऍपद्वारे सात-बारा उताऱ्यामध्ये नोंदवण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून मोबाइल ऍप विकसित केले आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात, नागपूर जिल्ह्यातील कामठी, अमरावतीमधील अचलपूर, औरंगाबाद मधील फुलंब्री, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मोबाइल ऍपद्वारे शेतकरी आपल्या शेतातील पिकांची माहिती तलाठ्यांना कळवित आहे. त्यानंतर तलाठी 15 दिवसांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन स्थळ पाहणी करून पीक पाहणी करत आहे.