मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान 22 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत कलम 188 नुसार 69 हजार 374 गुन्हे दाखल झाले असून 14 हजार 955 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 63 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
लॉकडाऊनदरम्यान राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबरवर 77 हजार 670 फोन आले. त्यासर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे, अशा 602 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1084 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि 45,168 वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.