नगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी(दि.21) 69.43 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा उपनिवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. रात्री उशिरापर्यत मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे अधिकृत आकडेवारी मिळण्यास उशिरा झाल्याने आज सकाळी ती जाहीर करण्यात आली.
काल सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला.पहिल्या दोन तासात म्हणजेच सकाळी 9 पर्यंत बारा मतदारसंघात केवळ 5.64 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी 11 पर्यंत हा आकडा 18.01 टक्क्यावर गेला. दुपारी 1 वाजता तो 33.73 तर तीन वाजता हा आकडा 40.20 टक्के म्हणजेच 50 टक्क्यापर्यंत गेला. त्यानंतर दुपारी 5 वाजता 62.86 टक्के झाली होती. तर सहा वाजता 64.73 इतकी होती.रात्री उशिरा बारा मतदारसंघांतील एकूण मतदानाची अधिकृत आकडेवारी 69.43 इतकी आहे.आता मतमोजणी परवा म्हणजेच गुरुवारी,दि.24 होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान नेवासा मतदारसंघात 80.07 टक्के झाले,तर सर्वात कमी मतदान नगर शहर मतदारसंघात 58.28 टक्के झाले.
दरम्यान,जिल्ह्यातील बारा जागांपैकी तीन ते चार जागा सोडल्या तर इतर सर्वच जागा चुरशीने व अटीतटीने लढल्या गेल्या.त्यामुळे येथे कोण विजयी होणार याबाबत कुणीच खात्री देवू शकत नाही.त्यातून या मतदारसंघांत पैजा,दावे-प्रतिदावे अन चर्चेच्या बाजारगप्पांना ऊत आला आहे. मतमोजणीपर्यंत हे चर्चेचे गुन्हाळ सुरुच राहणार आहे.
जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील मतदानाची सरासरी टक्केवारी पुढीलप्रमाणे- अकोले मतदारसंघ- सरासरी 68.20 टक्के, संगमनेर मतदारसंघ – 71.72, शिर्डी- 70.67, कोपरगाव – 76.23, श्रीरामपूर – 63.93, नेवासा – 80.07, शेवगाव – 65.65, राहुरी – 68.37, पारनेर – 70.23, अहमदनगर शहर-58.28, श्रीगोंदा- 67.66 आणि कर्जत-जामखेड – 73.98 टक्के.
2014 च्या मतदानाची टक्केवारी
– अकोले मतदारसंघ- सरासरी 67.56 टक्के, संगमनेर मतदारसंघ – 71.70, शिर्डी- 76.85, कोपरगाव – 79.95, श्रीरामपूर – 68.85, नेवासा – 74.50, शेवगाव – 72.86, राहुरी – 71.26, पारनेर – 68.31, अहमदनगर शहर-60.05, श्रीगोंदा- 73.65 आणि कर्जत-जामखेड – 66.04 टक्के.