औरंगाबाद: करोनाबाधितांच्या संख्येत 1 हजारचा टप्पा ओलांडणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याला मंगळवारी मोठाच दिलासा मिळाला. राज्य राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तब्बल 67 जवान करोनामुक्त झाले. पूर्ण बरे झाल्याने त्यांना उपचार केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला.
संबंधित जवानांना काही दिवसांसाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले होते. तिथून ते सुमारे दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबादमध्ये परतले. त्यानंतर घेण्यात आलेल्या चाचणीत त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले.
त्यामुळे त्यांना करोना संसर्गावरील उपचार केंद्रात हलवण्यात आले होते. आता ते ठणठणीत झाले आहेत. मात्र, आणखी सात दिवस त्यांचे विलगीकरण केले जाणार आहे. दरम्यान, नवे 53 करोनाबाधित आढळल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 75 इतकी झाली आहे.