नवी दिल्ली – गेल्या सुमारे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये दीर्घकाळ दैनंदिन व्यवहार बंद असल्याने भारतातील नागरिकांना ऑनलाइन व्यवहारांची सवय लागली आहे. त्यामुळेच 66 टक्के भारतीय दररोज किमान चार तास ऑनलाइन असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.
सायबर सिक्युरिटी संदर्भात काम करणाऱ्या नॉर्टन या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. ऑनलाइन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नोकरदारांव्यतिरिक्तही 82 टक्के लोक असे आहेत जे विविध कारणांनी ऑनलाइन रहात आहेत.
करोना महामारीच्या या कालावधीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आपला वेळ घालवण्यासाठी मोबाइल चांगले साधन बनला असेही या संशोधनात समोर आले आहे. नॉर्टन या संस्थेने ऑनलाइन विषयावर सर्वे घेण्यासाठीच 1000 भारतीयांशी चर्चा केली आणि त्यानंतर हे निष्कर्ष जाहीर केले.
या पाहणीत भाग घेतलेल्या बहुतांश नागरिकांनी आपल्याला ऑनलाइन व्यवहारांची आणि मोबाइलची सवय लागल्याचे मान्य केले आणि ही सवय आपल्या शरीरासाठी घातक असल्याचेही वाटू लागले आहे. महामारीच्या काळामध्ये ऑनलाइन व्यवहारांसाठी आणि इतर कामांसाठी मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणाऱ्यांना आता या वापराचे घातक परिणामही दिसू लागले आहेत.
हा सर्वे घेण्याचे नियोजन करणारे रितेश चोपडा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे याच कालावधीमध्ये भारतात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये ही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. उपकरणे वापरणारे लोक जर इंटरनेटचा वापर कोणत्याही माध्यमातून करत असतील तर त्यांना काळजी घेण्याची गरज आहे. विशेषत: ओपन वायफाय असेल तर सर्वांनी काळजी अधिक घ्यायला हवी असेही नीरज चोपडा यांनी सांगितले आहे.
ऑनलाइन व्यवहारांसाठी विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केल्यामुळे झोप न लागणे, डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, स्थूलपणा वाढणे, डिप्रेशन वाढणे अशा काही समस्यांना सामोरे जावे लागते असा इशाराही या सर्वेमध्ये संशोधकांनी दिला आहे.