मागणी घटली : यूपीतील उत्पादन वाढीमुळे बसला फटका
पुणे – साखर उद्योगात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला उत्तरप्रदेशातील साखर उत्पादनवाढीमुळे दोन वर्षांपासून फटका बसला आहे. त्यातच गळीत हंगामामुळे मागणी घटल्याने राज्यात 65 लाख टन साखर अजूनही पडून आहे. अशी माहिती राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी दिली.
साखर विश्व प्रतिष्ठान आणि शुगर इंडस्ट्रीज ऋणानुबंध यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कामगार, कर्मचारी शेतकऱ्यांसाठी पुण्यात मेळावा आयोजित केला होता. शिवाजीनगर येथील डीएसटीए हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला ज्ञानेश्वरी सहकारी साकर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, ऊस उत्पादक मोहनराव होलम पाटील, नॅशनल फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, जयवंत शुगरचे अध्यक्ष चारुदत्त देशपांडे, श्रीनाथ म्हस्कोबा मुख्याधिकारी दत्ताराम रासकर आदी उपस्थित होते.
यावेळी खताळ यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या स्थितीची माहिती दिली. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची देणी दिली असली, तरीदेखील कामगार, वाहतूक, व्यापारी यांची देणी दिलेली नाहीत. या सर्व अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी इथेनॉलचा पर्याय आता सोयीचा वाटू लागला आहे. याशिवाय आता महाराष्ट्राऐवजी उत्तर भारतातील साखरेचीगरज उत्तर प्रदेशातील साखर कारकाने भागवू लागले असल्याने या स्पर्धेला राज्यातील साखर कारखानदारीला तोंड द्यावे लागत आहे.
राज्यात 65 लाख टन पडून आहे. त्यामुळे साखरेपासून इथेनॉलमध्ये रुपांतर करण्याच्या प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे.
– संजय खताळ, साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक