27 हजार 411 हेक्टर क्षेत्र बाधित । 502 घरांची पडझड, 5 जनावरे दगावली
पुरामुळे साडेतीन हजार नागरिकांचे स्थलांतर
नदीकाठच्या गावात पाणी शिरण्यापूर्वी व नंतर प्रशासनाच्या वतीने 24 मदतीची पथके तयार केली होत्या. त्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. कोपरगाव तालुक्यात 15 मदत छावण्यामध्ये 663 नागरिकांना, श्रीरामपूरात 4 मदत छावण्यामध्ये 186 नागरिक तर नेवासा तालुक्यात 3 ठिकाणी 1 हजार 350 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. त्याचबरोबर राहाता तालुक्यात 2 मदत छावण्या मध्ये 1 हजार 341 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.
नगर – ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक व पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यात अकोले येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा, भिमा, घोड या नद्यांना आलेल्या पुराचा तडाखा नदीकाठच्या तब्बल 64 गावांना बसला असून या गावांचे 58 कोटी 85 लाख 75 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. नजर अंदाजित ही आकडेवारी आहे. त्यात शेतीचे 27 हजार 411 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 502 घरांची पडझड झाली आहे. तसेच लहान व मोठी अशी पाच जनावरे दगावली असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील पुरस्थितीवरून सांगली, कोल्हापूर व नाशिक जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील पुरग्रस्तांचा समावेश झाला आहे की नाही. याबाबत जिल्हा प्रशासन अनुत्तरित आहे.
4 ते 6 ऑगस्ट दरम्यान पुणे, नाशिक तसेच नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांना महापुर आला. प्रवरा पदीला आलेल्या पुरामुळे संगमनेर, अकोले. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासे तर पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भिमा, घोड व कुकडीला पुर आल्याने त्याचा तडाखा नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील नदीकाठच्या गावांना बसला. कोपरगाव शहरात पुराचे पाणी घुसले होते. तसेच अनेक गावांना पुराने वेढल्याने त्या गावांचा संपर्क तुटला होता. शेतामध्ये पाणी शिरले होते. घरांची त्यामुळे पडझड झाली. यात 59 कोटींचे नुकसान झाले असून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. या 59 कोटींमध्ये शेत जमिन, घरांची पडझड, रस्ते, यासह सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा उल्लेख करण्यात आला आहे.
शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात कर्जत तालुक्यात 67 हजार 513 हेक्टरपैकी 1 हजार 506 हेक्टरचे नुकसान झाले आहे. श्रीगोंदा तालुक्यात 41 हजार 17 हेक्टरपैकी 1 हजार 76 हेक्टर, श्रीरामपूर तालुक्यात 9 हजार 749 हेक्टरपैकी 1 हजार 541 हेक्टर, नेवासे तालुक्यात 48 हजार 965 हेक्टरपैकी 1 हजार 894 हेक्टर, संगमनेर तालुक्यात 77 हजार 245 हेक्टर क्षेत्रापैकी 440 हेक्टर, अकोले तालुक्यात 36 हजार 90 हेक्टरपैकी 19 हजार 160 हेक्टर, कोपरगाव तालुक्यात 44 हजार 214 पैकी 1 हजार 243 हेक्टर तर राहाता तालुक्यात 43 हजार 550 हेक्टर क्षेत्रापैकी 550 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. असे एकूण 3 लाख 68 हजार 344 हेक्टर क्षेत्रापैकी 27 हजार 411 हेक्टर क्षेत्रातील पिकांसह शेत जमिनीचे नुकसान झाले आहे.
हिंगणी, वारी, शिंगवे, पुणतांबा, नाहूर, खानापूर सरला बेट, भामठाण, कमालपूर, महांकाळ, वडगाव, रामपूर, नायगाव, जाफराबाद, मातुलठाण या गावात पुराचे पाणी घुसले.
गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळण थांबले. गोदेच्या पुरामुळे सोमवारी शाळा, महाविद्यालये बंद ठेवली होती. नदीकाठच्या शेतीचे पुरामुळे 27 हजार 411 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात 26 कोटी 85 लाख शेत जमिन व पिकांच्या नुकसानीचा आकडा पुढे आला आहे. 75 कच्चे घरे, 427 पक्की घरे, 21 झोपड्या पडल्या आहेत. तर मोठी जनावरे चार तर लहान जणावरे 1 अशी दगावली आहेत. कोपरगाव शहरातील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.