पुणे, ता. 23 – उपलब्ध असलेल्या सर्व माहितीचा व साधनांचा वापर करून, मराठ्यांचा संपूर्ण इतिहास लिहिण्याचे कार्य भारत इतिहास संशोधक मंडळ अगर तत्सम संस्थेने हाती घ्यावे अशी सूचना आज मुंबईचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली. मुंबई सरकारने दिलेल्या एक लाख रुपयांच्या देणगीतून भारत इतिहास संशोधन मंडळासाठी बांधण्यात आलेल्या वास्तु-लेख चित्र-शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मराठ्यांच्या इतिहासाचे लेखन व संशोधन पैशाअभावी महाराष्ट्र सरकार अडू देणार नाही. या आपल्या आश्वासनाचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. मराठ्यांच्या इतिहासाची विपूल साधने गावोगावी अजून पडलेली आहेत. ती नामशेष होतील. व त्यासाठी एक मोहीम काढण्यात यावी. तिचे मार्गदर्शन इतिहासाच्या विद्वान अभ्यासकांनी करावे अशी आणखी एक सूचना त्यांनी याप्रसंगी केली.
बेळगावला विसरू नका
मुंबई – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या उत्सवात दंग होऊन बेळगावच्या जनतेचे विस्मरण होऊ देऊ नका, असे आवाहन सं. म. समितीचे सरचिटणीस एस. एम. जोशी यांनी परवा विलेपार्ले येथील सत्कार सभेतील भाषणात केले. विलेपार्ले येथील सभेत एस. एम. यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना “लोकमित्र’ निधीसाठी 2041 रु. ची थैली अर्पण करण्यात आली. जनतेच्या परिश्रमातून व त्यागातून महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य मिळाले आहे. राज्यकर्त्यांना आपण वठणीवर आणले आहे.
त्याचा आनंद व्हावा हे साहजिक असले तरी म्हैसूरमध्ये घुसडलेला मराठी प्रदेश परत आलेला नाही. पण महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी काढण्याच्या कारस्थानात बळी पडलेल्या बेळगावचा उत्सवाचे प्रसंगी बिगर होऊ देता कामा नये असे सांगून बेळगाव कारवारचा प्रश्न कुचमत ठेवण्याच्या राज्यकर्त्यांच्या वृत्तीवर प्रकाश टाकून एस. एम. म्हणाले, यापुढे केवळ लाक्षणिक कायदेभंग करून भागणार नाही, जरूर तो त्याग करण्याची सिद्धता केली पाहिजे.