पुणे – पोलिसांकडून वारंवार आवाहन करून देखील हजारो नागरिकांनी लॉकडाउनचे उल्लंघन केल्याचे चित्र आहे. मागील आठवडाभरात पुणे पोलिसांनी सुमारे 6 हजारांहून अधिक वाहने जप्त केली असून, 9 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना नोटीस बजावल्या आहेत. मात्र, तरीही नागरिकांकडून संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. पुणे शहरातदेखील पोलीस सह आयुक्तांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहितेनुसार कलम 144 लागू केले होते. यानुसार वाहन वापरास आणि वाहतुकीला बंदी घातली आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना केवळ परवानगी देण्यात येत आहे. अन्य पुणेकरांना तातडीच्या आणि अत्यावश्यक कामासाठीच पोलिसांकडून शहरात ये-जा करण्यासाठी पासेस दिले आहेत.
मात्र, पुणेकर या सगळ्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत. नागरिकांनी लॉकडाउनचे उल्लंघन करू नये, यासाठी पोलिसांनी एकनाअनेक पद्धतीने आवाहन केले. सुरुवातीच्या काळात नागरिकांना चोप देखील दिला. या उपाययोजना करून देखील शहराच्या परिस्थितीमध्ये केवळ काही टक्के फरक पडला. या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी वाहन जप्तीचा बडगा उगारला. मात्र, पुणेकरांनी त्याला देखील हरताळ फासल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या निरीक्षणाखाली शहरात 13 ठिकाणी नाकाबंदीचे पॉइंटद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.