वायनाड – केरळात आम्ही न्युनतम आय योजना म्हणजेच न्याय योजना राबवून येथील गरीबांना दरमहा सहा हजार रूपयांची मदत घरपोच देऊ अशी ग्वाही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. आम्ही ही अतिशय क्रांतीकारी योजना या राज्यात राबवू इच्छितो.
अशी योजना देशातील अन्य कोणत्याही राज्यांमध्ये राबवली गेली नाही असे त्यांनी आज येथील वेल्लामुंदा येथील जाहीर सभेत बोलताना सांगितले. या सभेला येण्यापुर्वी राहुल गांधी यांनी थिरूनेल्ली येथील महाविष्णु मंदिराला भेट देऊन तिथे पुजा केली.
नंतर केलेल्या सभेत त्यांनी न्याय योजनाची विस्ताराने माहिती दिली. ते म्हणाले की आज गरीब माणूस अतिशय पिचलेला आहे. त्याला थेट आर्थिक मदत होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आम्ही गरीबांना दर वर्षी 72 हजार रूपये म्हणजेच महिन्याला सहा हजार रूपये थेट मदत देण्याची योजना या राज्यात राबवणार आहोत.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी कॉंग्रेसने देशात न्याय योजनेचे आश्वासन दिले होते पण त्या निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. तथापि केरळ सारख्या राज्यात ही योजना राबवून देशात एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करू असे ते म्हणाले.