नवी दिल्ली : मनी लॉन्डरिंगशी संबंधित प्रकरणी गॅंगस्टर इक्बाल मिर्चीशी संबंधित 600 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली असल्याचे सक्तवसुली संचलनालयाने म्हटले आहे.
या मालमत्तेमध्ये मुंबईतील वरळीतील “सीजय हाऊस’ या इमारतीतील तिसरा आणि चौथा मजला, ताडदेव भागातील अरुण चेंबर्समधील कार्यालय, वरळीतील साहिल बंगलो येथील तीन फ्लॅट, क्रॉफर्ड मार्केटमधील तीन व्यवसायिक दुकाने आणि बंगले तसेच लोणावळ्यातील 5 एकरांपेक्षा अधिक जमिनीचा समावेश आहे.
ही मालमत्ता मिर्चीने त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांच्या नावाने घेतली होती, असा आरोप ईडीने केला आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी प्रतिबंधात्मक आदेशाद्वारे ईडीने ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात ईडीने नुकतेच मुंबईतील विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले होते.
2013 मध्ये लंडनमध्ये मृत्यू झालेला मिर्ची मादक द्रव्यांची तस्करी आणि खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानला जात होता. मुंबई व आसपासच्या विविध मालमत्तांची मालकी अप्रत्यक्षरित्या मिर्चीची होती, असेही ईडीने म्हटले आहे.