मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे आणखी ६७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर गेला आहे. तर आज ६ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यात कोरोनाचे ६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४३ रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. तर १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. पुण्यामध्ये ९ रुग्ण तर अहमदनगरमध्ये ३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ५० कोरोनाबाधित या घातक विषाणूपासून बचावले आहेत.
दरम्यान, राज्यभरात आज कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. वसई-विरार, बदलापूर, जळगाव, पुणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा तर, मुंबईमधील २ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यामध्ये ३८ हजार ३९८ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून, ३ हजार ७२ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.