नवी दिल्ली – जगात वापर सुरू झालेले दूरसंचार क्षेत्रातील 5 जी स्पेक्ट्रम तंत्रज्ञान आता भारतातही लवकरच येणार असून त्या स्पेक्ट्रमचा लिलाव याच वर्षी पुर्ण होईल अशी माहिती दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. प्रसाद यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की सरकारी मालकीच्या एमटीएनएल, बीएसएनएल या कंपन्यांचे पुनरूज्जीवन करणे हे आपले प्राधान्य असेल. दूरसंचार कंपन्यांनी उत्तम व्यावसायिक म्हणून भूमिका बजावताना सरकारलाही सहकार्य करण्याचे धोरण ठेवावे अशी अपेक्षाही प्रसाद यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की आता 5 जी तंत्रज्ञान आले आहे.त्याचा देशात शक्य तितक्या लवकर प्रारंभ करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्याच्या चाचण्या पुढील शंभर दिवसात सुरू होतील असे ते म्हणाले. देशात वायफाय सुविधा वाढवण्यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.