– २५ कोरोनाबाधितांना घरी सोडले
– चिरागगल्लीच्या वृद्ध दांपत्याला कोरोनाची लागण कुठून झाली?
– दोन दिवस निरंक
नांदेड: शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी ओलांडली असताना गेल्या आठ दिवसात ५९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.विशेष म्हणजे १८ व २२ तारखेला एकही रुग्ण न सापडल्याने सहा दिवसातच एवढे रुग्ण जिल्ह्यात वाढले आहे.
कोरोनाच्या तपासण्या वाढविण्यात आल्याने कोरोनाची लागण झालेले अनेक रुग्ण समोर येत असून त्यामुळे गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोनाने एकीकडे नांदेडकरांची चिंता वाढवली असताना २५ कोरोना रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने त्यांना दिलासाही मिळाला आहे. यापूर्वीही ३० रुग्णांना घरी पाठविण्यात आले होते.
मुंबई व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा धोका वाढला असताना गुरुवारी चिरागगल्ली भागात राहणाऱ्या एका वृद्ध दांपत्याला कोरोनाची लागण झाली असून त्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. आजारी असलेल्या या दोघांनी नांदेडच्या बाहेर पाऊल टाकले नसताना ते कोरोना पॉझिटिव्ह कसे निघाले हा मोठा प्रश्न आहे.त्याच बरोबर जिल्ह्यातील माहूर,अर्धापुर (बारड), मुखेड,नायगांव, भोकर व बिलोली या सहा तालुक्यांमध्ये कोरोनाने प्रवेश केला असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहाण्याची गरज आहे.
अलीकडे जे रुग्ण सापडले त्यामध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. दुसरीकडे करबला व कुंभारटेकडी भागात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या रुग्णामुळे या भागातील साखळी तोडण्याची आज गरज आहे.