आळंदी – खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी आळंदी शहर व परिसरात 58.90 टक्के मतदान झाल्याची माहिती क्षेत्रीय अधिकारी तथा मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.
मतदान प्रक्रियेसाठी येथील ज्ञानेश्वर विद्यालय, बालक मंदिर शाळा, पालिका शाळा क्रमांक एक, एमआयटी कॉलेज, दुराफे विद्यालय आदी ठिकाणच्या एकूण 21 केंद्रांवर प्रक्रिया पार पडली. पावसाचा अंदाज असल्याने या ठिकाणी मंडपावर पत्रे टाकण्यात आले होते. यामुळे दुपारी कडक उन्हात मतदारांना सुरळीत मतदान करता आले. चुरशीची लढत असल्याने मतदान केंद्रांचा परिसर राजकीय कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. हळूहळू मतदारांची गर्दी होत गेली. दुपारपर्यंत केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदानाचा हक्क बजावला नंतर सेल्फी पॉइंट कक्ष उभारल्याने सर्वांचे लक्ष सेल्फी पॉइंटकडे होते. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्या नियतीताई शिंदे यांसह पत्रकार, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच मतदारांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही.
उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदान केंद्राबाहेर थाटलेल्या बूथवरील प्रतिनिधींकडून नावे शोधण्याची धावपळ सुरू होती. हक्काच्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी वाहनांचा वापर केला होता. मतदान केंद्राजवळ जमणारा जमाव पांगविण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती. काही ठिकाणी मंडप उभरण्यात आल्याने पत्रे टाकत सावली करण्यात आली होती तर काही ठिकाणी घामाच्या धारांमध्ये कर्मचाऱ्यांना काम करावे लागले. काही ठिकाणी ओळखपत्रांमध्ये संशय असल्यास उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सहमतीनेच मतदान न करताच मतदारांना परत पाठवून दिले गेले; मात्र त्यांची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाही.